गेल्या 25 वर्षांपासून तरुणांना वेड लावणारं गाणं, इतकी क्रेझ की बनलं पार्टी अँथम, ऐकू येताच तरुण..
25 वर्षांपूर्वी फरहान अख्तरने एक चित्रपट बनवला होता, ज्याने संपूर्ण तरूणाईला वेड लावलं होतं. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट एव्हरग्रीन असून आजही तो आवडीने पाहिला जातो. त्यातली गाणी तर सदाबहार आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडमधील काही चित्रपट असे असतात, जे केवळ मोठ्या पडद्यावर येत नाहीत, तर ते प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात.2001 साली आलेला ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) हा चित्रपटही त्यापैकीच एक. अभिनेता- दिग्दर्शक फरहान अख्तर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाला आता तब्बल 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. मात्र आजही तो एव्हरग्रीन आहे. याच निमित्ताने चित्रपटाशी जोडलेल्या कलाकारांनी आणि टीमने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ने त्याकाळातील तरुणाईची मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळ्या पद्धतीने पडद्यावर मांडला. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या मैत्रीची ही कथा आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच ताजी आहे. विशेष म्हणजे, गोव्याच्या ट्रिपपासून ते ‘कोई कहे कहता रहे’पर्यंत चित्रपटातील अनेक गोष्टी आजही पॉप कल्चरचा भाग आहेत.
सिनेमॅटोग्राफरने शेअर केल्या जुन्या आठवणी
या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर रवि के. चंद्रन यांनी सोशल मीडियावर ‘दिल चाहता है’चे पोस्टर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यासाठी हा चित्रपट केवळ एक प्रोजेक्ट नव्हता, तर त्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा टर्निंग पॉइंट ठरल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला अनेक नवीन तंत्रांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. सिंक साउंड, गॅफर आणि ग्रिप सिस्टमसोबत काम करण्यापासून ते चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकण्यापर्यंतचा हा प्रवास त्यांच्यासाठी खास होता, असं चंद्रन यांनी नमूद केलं.
विशेष म्हणजे हा चित्रपट पुढे जाऊन इतका मोठा ठरेल, याची टीमलाही कल्पना नव्हती. “दिल चाहता है” बनवताना संपूर्ण टीम काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, हा प्रवास पुढे जाऊन हिंदी सिनेमाच्या भाषेलाच आणि लूकलाच नवी दिशा देईल, याची त्यांना कल्पना नव्हती, असं चंद्रन यांनी म्हटलं.
तर दुसरीकडे फरहान अख्तर आणि त्याची बहीण, दिग्दर्शिका झोया अख्तर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या 25 वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा केला.
‘कोई कहे कहता रहे’ आजही पार्टीची जान !
या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्याशिवाय प्रीति झिंटा, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. ‘दिल चाहता है’ ची चर्चा होत असताना त्याच्या संगीताचा उल्लेख न होणे अशक्य आहे. हा चित्रपट जेवढा एव्हरग्रीन आहे ना, तेवढीच त्यातली गाणीही सदाबहार आहेत. दिल चाहता है, हे टायटल साँग असो की कैसी हे ये रुत की जिसमे, हे हळूवार प्रेमगीत , अथवा जाने क्यूँ लोग प्यार करते है, हे गीत… सगळीच गाणीमस्त, आणि सहज गुणगुणता येतील अशीच. याच चित्रपटातलं गाजलेलं आणखी एक गाणं म्हणजे ‘कोई कहे कहता रहे’… हे गाणं आजही पार्ट्या आणि क्लबमध्ये तितक्याच उत्साहाने वाजवलं जातं.
आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांची धमाल केमिस्ट्री, जबरदस्त संगीत आणि भन्नाट एनर्जीने भरलेलं हे गाणे रिलीज होताच सुपरहिट ठरलं. जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला शान, केके आणि शंकर महादेवन यांच्या आवाजाने एक वेगळीच ऊर्जा दिली. आज 25 वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. उलट, नवी पिढीदेखील या गाण्यावर थिरकताना दिसते.