Manoj Jarange Patil : बावनकुळे आणि शिरसाट यांनी चूक केली, 29 ऑगस्टनंतर…मनोज जरांगे यांचा संताप; कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावर सरकारला इशारा
नवीन घाट घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक नवीन डाव सुरु झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्या. मंत्र्यांचं ऐकून कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. सरकारकडून मराठा समाजाच्या कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र अवैध ठरवले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. मंत्री संजय शिरसाट तसेच ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ते सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, येत्या 29 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या उपोषणासाठी मराठा समाजने एकवटायचे आहे, असे आवाहन जरांगे करत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांची सुटका नाही, असे म्हणत त्यांनी सरकारलाच घेरलं आहे.
अधिकाऱ्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये
नवीन घाट घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक नवीन डाव सुरु झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्यात आल्या. मंत्र्यांचं ऐकून कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लावू नये. अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, असा रोखठोक इशारा जरांगे यांनी दिला. तसेच अधिकारी प्रवक्त्याची भूमिका घेत आहेत. अधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या भूमिकेत जगू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आमचा आणि बावनकुळे यांचा संबंध नव्हता
आतापर्यंत सगळे कुळ ऐकले, परंतू बावनकुळ कुठून आले? मराठ्यांमध्ये गैरसमाज पसरविण्याचं काम सुरु आहे. बावनकुळे त्यांची बाजू सेफ करण्याच्या प्रयत्न करत आहेत. इतका खटाटोप करायचं होता, तर प्रमाणपत्र रद्द करायची गरज नव्हती. आमचा आणि बावनकुळे यांचा संबंध नव्हता. जात पडताळणी समितीमध्ये हस्तक्षेप करता येत नव्हता, तर बावनकुळे यांनी पत्र काढलाच कसं? असा सवाल जरांगे यांनी केला.
बावनकुळे हा माणूस फार विचित्र दिसतोय
मराठ्यांना अजून किती येड्यात काढता. आता आम्ही हुशार झालो तुम्हाला भीक घालणार नाह.,आमच्या जीवावर तुम्ही कमावून बसले. आता फक्त स्पष्टीकरण देण्याची मरमर सुरु आहे. आम्ही चूक केलीच नाही असं बावनकुळे यांचं म्हणणं आहे. 29 ऑगस्ट नंतर मराठवाड्यात मंत्र्यांना फिरू द्यायचं नाही हे मराठ्यांनी आता ठरविले आहे. बावनकुळे हा माणूस फार विचित्र दिसतोय. बावनकुळे तुम्ही पाप केलं आहे. तुम्हाला आता ते भोगावंच लागणार आहे. तुम्ही मराठ्यावर अन्याय केला आहे, अशी बोचरी टीका मनोज जरांगे यांनी केलंय.
58 लाख नोंदी कमी करायच्या नाहीत
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. फडणवीस आणि शिंदे यांनी त्यांची झालेली चूक सुधारावी. मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी कमी करायच्या नाही तुम्ही खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच बावनकुळे आणि शिरसाट यांनी चूक केली. आम्ही असेच कुणावरही आरोप करत नाही. आमच्यावर संस्कार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आता 29 ऑगस्टनंतर नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
