शाहरुख-काजोलच्या प्रेमकथेतील ते प्रसिद्ध मोहरीचं शेत कुठलं ? भल्याभल्याचं चुकतं उत्तर.. जाणून घ्या खास किस्सा
31 वर्षांपू्र्वी रिलीज झालेलं हे गाणं बॉलिवूडच्या लोकप्रिय रोमँटिक गाण्यापैकी एक आहे. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये आजंही या गाण्याचं स्थान अबाधित आहे.

1995 साली प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट आजही प्रेमकथेच्या दुनियेतील एक अजरामर नाव आहे. या चित्रपटातील ‘तुझे देखा तो ये जाना सनम’ हे गाणं तर हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. हे गाणं ऐकलं नसेल असा इसम विरळाच. शाहरुख खान आणि काजोलची रोमँटिक केमिस्ट्री, डोळ्यांसमोर पसरलेली मोहरीची पिवळी शेतं आणि कुमार सानू-लता मंगेशकर यांचा सुरेल आवाज – अशा त्रिकुटामुळे हे गाणं 3 दशकानंतरही तितकंच खास वाटतं. विशेष म्हणजे, या गाण्यात दिसणाऱ्या मोहरीच पिवळी शेतं ही पंजाबमधलीच असल्याचं अनेकांना वाटत, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. कारण या गाण्यातील आयकॉनिक दृश्यांचं शूटिंग पंजाबमध्ये नव्हे, तर दिल्ली-एनसीआरमधील गुरुग्रामच्या बाहेरील भागात करण्यात आलं होतं. पुढे हेच पिवळं शेत बॉलिवूडमधील प्रेम आणि रोमँटिक दृश्यांचे प्रतीक बनलं.
गुरुग्राममध्ये सापडलं ‘राज-सिमरन’च्या प्रेमाचं साक्षीदार असलेलं शेत
‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्यात दिसणारं शेत गुरूग्राममधलं होतं. या गाण्याच्या शूटिंगसाठी ग्दर्शक आदित्य चोप्रा यांना अशा शेताच्या शोधात होतो, जिथे दूरपर्यंत फक्त पिवळी रोपंच दिसतील. त्याच्या टीमने पंजाबमध्ये जाऊन खूप शोध घेतला, पण त्यांना अपेक्षित होतं तसं दृश्य काही त्यांना मिळालं नाही. अखेर हा शोध गुरुग्रामपर्यंत येऊन थांबला आणि तिथेच चित्रपटाच्या टीमला अगदी हवं तसं मोहरीचे शेत सापडलं. विशेष म्हणजे शूटिंगसाठी या शेतात जाण्याची परवानगी मिळवणं खूप सोपं काम नव्हतं. एका रिपोर्टनुसार, अभिनेता शाहरुख खानने हरियाणवी भाषा बोलून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शूटिंगसाठी त्यांना राजी केलं.
कुमार सानू-लता मंगेशकरांचे अवीट सुरांनी झालं गाणं अजरामर
‘तुझे देखा तो ये जाना सनम’ या गाण्याला कुमार सानू आणि लता मंगेशकर यांचा अवीट सूर लाभला. जतीन-ललित यांनी या गाण्याला संगीत दिले, तर आनंद बक्षी यांनी त्याचे बोल लिहिले होते. प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींच्या भावना साध्या, सुंदर आणि हळुवार शब्दांत व्यक्त करणारे हे गाणे आजही श्रोत्यांच्या मनाला भिडतं. त्याची मधुर चाल आणि भावस्पर्शी शब्द यामुळे 90च्या दशकातील हे गाणे पुढल्या कित्येक पिढ्यांपर्यंत पोहोचलं आणि लोकप्रियही झालं.
या चित्रपटात शाहुख खान आणि काजोल यांच्याशिवाय अमरीश पुरी, फरीदा जलाल आणि अनुपम खेर यांच्याही मुख्य भूमिका होत्या. आदित्य चोप्राने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. 20 ऑक्टोबर 1995 साली रिलीज झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट फक्त गाणी आणि रोमान्समुळे गाजला नाही तर बॉक्स ऑफीसवरही चित्रपटाने मोठी कमाई केली. या चित्रपटाने भारतात मोठा गल्ला कमावला आणि सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.