दीपिकाच्या ‘फैजा’ नावावरून तुफान ट्रोलिंग; अभिनेत्री म्हणाली ‘तिने निकाह केला असेल तर..’
अभिनेत्री दीपिका कक्करला तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दीपिकाने याच मालिकेतील सहअभिनेता शोएब इब्राहिमशी आंतरधर्मीय लग्न केलं. दीपिका हिंदू असून शोएब मुस्लीम आहे. त्यामुळे शोएबशी निकाह करताना तिने तिचं नाव बदलून ‘फैजा’ असं ठेवल्याचं म्हटलं जातं. यावरून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता ज्येष्ठ अभिनेत्री शगुफ्ता अली यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शगुफ्ताने दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. जर दीपिका आणि शोएब त्यांच्या आयुष्यात खुश असतील तर याने इतरांना काय त्रास आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
शगुफ्ता म्हणाल्या, “दीपिकाने तिच्या मर्जीने लग्न केलं आहे. ती तिच्या पतीसोबत खुश आहे आणि तिला तिचं भविष्य माहीत आहे. जर ती खुश आहे तर लोकांना का त्रास होतोय? तुम्ही त्यांचे खर्च उचलत आहात का? तुम्ही त्यांना राशन-पाणी देत आहात का? जर पती-पत्नी त्यांच्या आयुष्यात खुश आहेत तर याने दुसऱ्यांना काय समस्या आहे? कृपया त्या दोघांना सोडा. दीपिका खूपच प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. जर कोणाला दीपिका आणि शोएबचे व्लॉग पसंत नसतील, तर त्यांना ते बघणं बंधनकारक नाहीये. त्यांचे व्लॉग्स बघायचे नसतील तर बघू नका. परंतु प्रत्येक गोष्टीवर ट्रोलिंग का? व्हिडीओ पाहू नका, हा पर्याय तुमच्याकड आहे.”
दीपिकाच्या ‘फैजा’ नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर तिने निकाह केला असेल किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ही तिची मर्जी आहे. परंतु ती आजही दीपिका कक्कर याच नावाने काम करतेय. शोएबने कधीच म्हटलं नाही की तिला दीपिका बोलू नका, फक्त फैजा म्हणूनच हाक मारा. जर त्यांच्यात काही समस्या नाहीये तर लोकांना का आहे? सोशल मीडियावर लोक विनाकारण दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात. लोकांना इतरांचा आनंद बघवत नाही. मी नेहमी हेच पाहिलं आहे. त्यांचं आयुष्य आहे, त्यांना जसं जगायचं असेल तसं जगू द्या. मी तर म्हणते व्लॉग करणंच सोडून दिलं पाहिजे. जेव्हा आपलं आयुष्य सर्वांसमोर येतं, तेव्हा प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागतं. दोघांना इतकं ट्रोल करण्यात आलं की ते रडू लागले. ही तर हद्दच झाली. त्यांना त्यांचं आयुष्य सुखाने जगू द्या”, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना फटकारलं आहे.