युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्त्रायली कुटुंबाला ‘ही’ लोकप्रिय मालिका देतेय दिलासा; अभिनेत्रीची भावूक पोस्ट
युद्धाच्या सावटात अडकलेल्या इस्रायली कुटुंबाला ही मराठी लोकप्रिय मालिका दिलासा देत आहे. या कुटुंबाने व्हिडीओद्वारे मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते, याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं. इस्त्रायलमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. डॅनियल कुटुंबाने यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कुटुंबीयांनी सांगितलं की, “सततच्या तणावपूर्ण वातावरणात ‘ठरलं तर मग’ ही मालिका आमच्यासाठी एक दिलासा ठरत आहे. आम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ही मालिका पाहतो. आम्हाला ही मालिका खूप आवडते.” डॅनियल कुटुंबाने अर्जुन आणि सायली या मुख्य जोडीसोबतच प्रियाच्या अभिनयाचंही कौतुक केलं आहे.
सायलीची भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. ‘गेले काही दिवस ‘ठरलं तर मग’ची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. 45 मिनिटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच.. एपिसोड थांबता कामा नये. अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते, तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो, याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो,’ अशी भावना जुईने व्यक्त केली.
पहा डॅनियल कुटुंबीयांचा व्हिडीओ-
या व्हिडीओवर सुचित्रा बांदेकर यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ‘धन्यवाद डॅनियल कुटुंब.. तुमचं प्रेम या व्हिडीओद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. तुम्हाला आनंदाचे काही क्षण आम्ही देऊ शकलो याचं समाधान निर्माते म्हणून आमच्या संपूर्ण सोहम प्रॉडक्शन परिवाराला आहे,’ असं लिहित बांदेकर यांनी डॅनियल कुटुंबाचे आभार मानले आहेत. ‘ठरलं तर मग’ ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या तीन वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकत अनेक पुरस्कारदेखील पटकावले आहेत.