Gashmeer Mahajani | “कर्ज झाल्यावर ते घर सोडून गेले अन् आम्ही..”; संघर्षाबद्दल पहिल्यांदाच गश्मीर व्यक्त

वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीर पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्याने त्याचा संघर्ष उलगडून सांगितला. दहावीनंतरच त्याने कामाला सुरुवात केली आणि जवळपास सहा वर्षांपर्यंत त्याने कर्ज फेडलं.

Gashmeer Mahajani | कर्ज झाल्यावर ते घर सोडून गेले अन् आम्ही..; संघर्षाबद्दल पहिल्यांदाच गश्मीर व्यक्त
Ravindra and Gashmeer Mahajani
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 30, 2023 | 7:25 PM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता गश्मीर महाजनीने वयाच्या पंधराव्या वर्षापासून कुटुंबाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली होती. बँकेचं कर्ज झाल्यानंतर वडील रवींद्र महाजनी हे घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर गश्मीरने सर्व कर्ज फेडलं. त्या संघर्षाच्या काळाबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत त्याने रवींद्र महाजनी यांच्या निधनामागचं कारणसुद्धा सांगितलं. जुलै महिन्यात तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी गश्मीरला दिली.

“आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हातापाय पडून सांगितलं…”

‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने सांगितलं, “मी दहावीत होतो. त्यावेळी कर्ज झाल्यानंतर त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. नंतर बँकेची लोकं कर्जाच्या परतफेडीसाठी आमच्या मागे लागली. मी अवघा 15 वर्षांचा होतो आणि मला त्यांची भीती वाटायची. अचानक आठ-दहा आडदांड माणसं येऊन घर सील करणार वगैरे म्हणायचे. आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हातापाय पडून सांगितलं, की जरी बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. तुम्ही घर सील करू नका. मग त्यांनी आमच्याकडून लिखित स्वरुपात आश्वासन घेतलं. त्यावेळी आम्ही रात्री रस्त्यावर पोस्टर लावायला जायचो. मी 15-16 वर्षांचा असल्याने पोलिसांनी मला पकडू नये म्हणून आई आमची एक जुनी गाडी होती, ती घेऊन यायची. तिथून सुरूवात केली आणि हळूहळू इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करू लागलो. सोबत डान्स अकॅडमीसुद्धा होती. कॉर्पोरेट इव्हेंट्समधून जे काही मला पैसे मिळायचे त्यातून मी संपूर्ण कर्ज फेडलं. वयाच्या 21 वर्षी ते संपूर्ण कर्ज फेडण्यात मला यश आलं. त्या सहा वर्षांत जे काही पैसे घरात आले, ते सर्व उचलून आम्ही बँकेला द्यायचो.”

“..तर त्यांच्या आत्म्यालाच हे मंजूर होणार नाही”

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर सोशल मीडियाद्वारे बरीच टीका झाली होती. त्याविषयी तो पुढे म्हणाला, “आता जे लोक असं म्हणतात की, एवढ्या मोठ्या घरात राहतोस. बापामुळे तू एवढं कमावलंस. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी हे सगळं खूप मेहनत करून कमावलं आहे. मी कुठून आलोय, हे मला माहीत आहे. रवींद्र महाजनी हे हलाखीच्या परिस्थितीत गेले, असं कोणी आज लिहित असेल तर त्यांच्या आत्म्यालाच हे मंजूर होणार नाही. त्यांना असं बोललेलं अजिबात आवडायचं नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us