मर्यादेत रहा.. ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ वादावरून कैलाश खेर यांनी थेट सुनावलं..

Kailash Kher : 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) मध्ये बिहार आणि काश्मीरच्या मुद्यावरून करण्यात आलेला जोक अनेकांना रुचला नाही, त्यामुळे बराच वादही झाला. आता गायक कैलाश खेर यांनीही यावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.

मर्यादेत रहा..  ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ वादावरून कैलाश खेर यांनी थेट सुनावलं..
Kailash Kher
| Updated on: Sep 07, 2026 | 8:39 PM

Kailash Kher : विख्यात गायक कैलाश खेर (Kailash Kher) हे त्यांच्या सुरांसाठी तर प्रसिद्ध आहेतच, पण त्यांच्या विचारांमुळेही ते ओळखले जातात. नुकतंच त्यांनी सार्वजनिक चर्चेत अधिक जागरूकता आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचे आवाहन केलंय. ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या स्टँड-अप कॉमेडी शोमधील बिहार आणि काश्मीरशी संबंधित विनोदांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकांनी बोलताना जरा संवेदनशीलता बाळगण्याची आणि शिष्टाचार जपण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं. एएनआयशी संवाद साधत असताना कैलाश खेर यांना काश्मिरी पंडित आणि बिहारी समाजाशी संबंधित वक्तव्यांवरून विनोद करणाऱ्या कॉमेडियनविरोधातील टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच सोशल मीडियावर स्टँड-अप कॉमेडीच्या मर्यादांवर सुरू असलेल्या चर्चेबद्दलही त्यांना विचारणा करण्यात आली.

यावर खेर यांनी संगीताचे उदाहरण देत आपलं मत मांडलं. ते म्हणाले, ‘संगीत म्हणजे केवळ एखादी धुन किंवा चाल नसते. संगीत तुम्हाला आनंद देऊ शकते, हसवू शकते आणि त्यातून शिस्तही शिकता येते. त्यामुळे कलाकाराने आपल्या कलेशी प्रामाणिकपणे जोडलेलं राहणं गरजेचं आहे. जर तुमची ‘धून’च योग्य नसेल, तर तुम्ही दुसऱ्याची खिल्ली उडवू शकता’ असं त्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी माणसाच्या वागणुकीत नम्रता आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित केलं. ‘ माणसाने नेहमी सतर्क आणि नम्र राहिलं पाहिजे. प्रत्येकाशी आदराने आणि सभ्यतेने संवाद साधला पाहिजे. कसं जगायचं, कसं हसायचं आणि इतरांचं मन कसं जिंकायचं हे प्रत्येकाला समजायला हव,’ असे ते म्हणाले.

मी नेहमी नम्र राहण्याचा प्रय्तन केला

आपल्या कारकिर्दीतील प्रसिद्धीबाबत बोलताना खेर यांनी आपण नेहमी नम्र राहण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी नेहमीच नम्र राहिलोय. मात्र, प्रसिद्धी मिळाल्यानंतर टीका, द्वेष आणि मत्सर यांचाही सामना करावा लागतो, असं त्यांनी नमूद केलं. ‘ टीका करणारे असतील, द्वेष करणारे असतील आणि मत्सर करणारेही असतील. अशा वेळी आपल्याला आपण किती मोठा प्रवास केला आहे, याची जाणीव होतं,’ असे खेर यांनी नमूद केलं.

दरम्यान , ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’च्या दुसऱ्या सीझनमधील समय रैना आणि कॉमेडियन शेरोन वर्मा यांच्यातील चर्चेवरूनही वाद निर्माण झाला होता. बिहार आणि काश्मीरशी संबंधित विनोदांमुळे या प्रकरणाला राजकीय रंगही मिळाला. शेरोन वर्मा या शोच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. दुसऱ्या सीझनमध्ये ती त्या समय रैना, ओरी, अर्चना पूरन सिंह आणि निशांत सूरी यांच्यासोबत पॅनेलिस्ट म्हणून दिसली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us