Kapil Sharma ने अखेर कबूल केली चूक; सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं सांगितलं कारण

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने 'द कपिल शर्मा शो' सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती.

Kapil Sharma ने अखेर कबूल केली चूक; सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं सांगितलं कारण
Kapil Sharma and Sunil Grover
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2023 | 8:04 AM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच ‘ज्विगाटो’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सोबतच्या वादावर कपिल मोकळेपणे व्यक्त झाला. जवळपास पाच वर्षांनंतर कपिल त्या वादावर खुलेपणाने बोलला आणि यावेळी त्याने आपली चूक सुद्धा मान्य केली. सुनीलसोबत झालेल्या वादासाठी त्याने स्वतःच्या रागाला कारणीभूत ठरवलं. इतकंच नव्हे तर चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक आणि अली असगर यांनी ‘ द कपिल शर्मा शो ‘ का सोडला, यामागचं कारणही त्याने सांगितलं.

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने सोडला होता शो

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती. या घटनेनंतर कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत कपिलने त्याची चूक मान्य केली आहे.

कपिलने मान्य केली चूक

कपिलने पहिल्यांदाच एखाद्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली की त्याचं विमानात सुनीलसोबत खूप मोठं भांडण झालं होतं. “मला ही गोष्ट स्वीकारायला कोणतीच कमतरता वाटत नाही की मी लहानसहान गोष्टींवरून खूप राग यायचा. ते माझ्या रक्तातच आहे. मी लोकांवर खूप प्रेम करतो पण जेव्हा मला राग येतो तेव्हा माझं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. पण आता माझ्या स्वभावात बराच बदल झाला आहे. लोक म्हणतात की ते माझे शत्रू आहेत, पण मी कोणालाच माझा शत्रू मानत नाही,” असं कपिल म्हणाला.

“तुम्ही मला अहंकारी म्हणालात तरी चालेल”

द कपिल शर्मा शोमधून बाहेर पडलेल्या इतर कलाकारांविषयी तो पुढे म्हणाला, “तुम्ही मला अहंकारी म्हणालात तरी चालेल. पण तुम्ही त्यांना जाऊन विचारा की माझ्यासोबत त्यांना का काम करायचं नाही. सुनीलसोबत माझा वाद झाला होता. पण इतरांसोबत माझे चांगले संबंध होते.”

2020 दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलसोबतच्या वादाबाबत कपिल म्हणाला होता, “छोटे छोटे वाद होतंच राहतात, पण त्याने नाती तुटत किंवा संपत नाहीत.” गेल्या वर्षी जेव्हा सुनीलला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा कपिलने त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती.