करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं? इन्साईड स्टोरी पहिल्यांदाच आली समोर
सुनील दर्शन यांनी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनच्या तुटलेल्या साखरपुड्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ते करिश्माच्या घरीच होते जेव्हा साखरपुडा मोडला. दोघांचे नाते घट्ट असूनही ते वेगळे झाले. यानंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न केले, ज्याचा अर्थ सुनील दर्शन यांना कधीच लागला नाही. नशिबावर सर्व सोपवावे, असे त्यांचे मत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात चर्चा झालेल्या ब्रेकअपबाबत फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा मोडला तेव्हा ते करिश्माच्या घरीच होते. साखरपुडा मोडल्यानंतर अनेक घटना वेगाने घडल्या. काय घडतंय तेच कळत नव्हतं. गोष्टी एवढ्या पुढे गेल्या की करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. तिने असं का केलं हे मला कळलंच नाही, असं सुनील दर्शन यांचं म्हणणं आहे.
सुनील दर्शन यांनी हिंदी रशशी संवाद साधताना ही माहिती दिली. करिश्मा कपूरच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनेच्या प्रसंगी सुनील दर्शन करिश्माच्या अत्यंत जवळ होते. करिश्माने सुनील दर्शन यांच्या जानवर, हां मैने भी प्यार किया आणि एक रिश्ता : द बॉन्ड ऑफ लव्ह आदी सिनेमात काम केलं होतं. त्याचवेळी त्यांनी करिश्मा आणि अभिषेकचं प्रेम जुळताना पाहिलं. दोघंही एकमेकांविषयी अत्यंत हळवे आणि भावूक होते.
नातं घट्टं होतं…
एक रिश्ता या सिनेमाच्या शुटिंगच्या पूर्वीच करिश्मा आणि अभिषेकची रिलेशनशीप सुरू झाली होती. काळानुसार दोघांचं नातं खूप घट्ट झालं. त्याचवेळी मी हां मैने भी प्यार किया या सिनेमाची योजना तयार केली. तेव्हा दोघांचं लग्न होणार हे ठरलं होतं. दोघांची जोडी खूप चांगली होती. अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि राज कपूर यांची नात, असं दर्शन म्हणाले.
ती दु:खद घटना
जेव्हा करिश्माचा साखरपुडा मोडल्याची बातमी आली, तेव्हा मी करिश्माच्या घरीच होतो. हा केवळ योगायोग होता. लग्न मोडणं अत्यंत वाईट गोष्ट होती. मला नाही वाटत कोणी या भावनात्मक गोष्टीला पूर्ण समजून घेतील. त्यानंतर करिश्मा नव्या वर्षासाठी बँकॉकला गेली. नंतर अचानक मला कळलं की करिश्माने संजयसोबत लग्न केलं. मला तिचा हा निर्णय कधीच समजला नाही.
नशिबावर सोडा
करिश्मा आणि अभिषेक वेगळे का झाले? त्या मागचं कारण काय? असा सवाल दर्शन यांना करण्यात आला. तेव्हा त्यांनी कुणालाच जबाबदार ठरवलं नाही. लोक बबिता जी, जया जी, करिश्मा वा अभिषेकला दोष देतात. पण मला वाटतं अशा गोष्टी नशिबावर सोडल्या पाहिजे. त्यांचं नातं खूप भावूक होतं. प्रेम प्रत्येक जोडप्यात वेगळ्या पद्धतीने दिसून येतं. ही एक वेगळीच दुनिया असते. दोघांमध्ये बरेच मतभेद होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कारण कधीच सांगितलं नाही
करिश्मा आणि अभिषेकने 2002मध्ये साखरपुडा केला होता. दोघाांनी अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या जन्म दिनाच्या दिवशी आपलं नातं सार्वजनिक केलं होतं. पण काही महिन्यानंतर 2003च्या सुरुवातीला त्यांचा साखरपुडा तुटला. दोन्ही कुटुंबाने या मागचं कारण कधीच सांगितलं नाही.