Hindi: ‘हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीप जे बोलला ते योग्यच’; अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटले

| Updated on: Apr 28, 2022 | 3:20 PM

हिंदी (Hindi) ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kichha Sudeep) यांच्यात झालेल्या ट्विटरवॉरमध्ये उडी घेतली आहे.

Hindi: हिंदी भाषेबाबत किच्चा सुदीप जे बोलला ते योग्यच; अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटले
अजय देवगणविरोधात कर्नाटकचे नेते एकवटले
Image Credit source: Facebook
Follow us on

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि किच्चा सुदीप (Kichha Sudeep) यांच्यात झालेल्या ट्विटरवॉरमध्ये उडी घेतली आहे. ‘हिंदी (Hindi) ही भारताची राष्ट्रीय भाषा ना कधी होती आणि ना कधी असणार,’ असं त्यांनी म्हटलंय. हिंदी भाषेवरूनच अजय आणि आणि सुदीप यांच्यात ट्विटरवॉर झाला होता. त्यावरून काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या म्हणाले, ‘मला कन्नड असल्याचा अभिमान आहे. देशातल्या भाषिक विविधतेचं कौतुक करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. प्रत्येक भाषेचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे, ज्याचा लोकांना अभिमान आहे.’ हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं सुदीपने म्हटलं होतं. त्यावर अजयने ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘भारतात 19500 मातृभाषा बोलल्या जातात. भारताबद्दलचं प्रेम प्रत्येक भाषेत सारखंच आहे. एक अभिमानी कन्नडिगा आणि अभिमानी काँग्रेसी या नात्याने मी सर्वांना या गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की काँग्रेसने भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती केली, जेणेकरून कोणतीही भाषा दुसर्‍या भाषेवर वर्चस्व गाजवू नये. #विविधतेत एकता’, असं ते म्हणाले. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडी (एस)चे नेते एचडी कुमारस्वामी यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली. ‘सुदीपच्या वक्तव्यात काहीही चुकीचं नाही,’ असं ते म्हणाले.

एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं किच्चा सुदीपचं म्हणणं योग्य आहे. त्याच्या वक्तव्यात चुकीचं असं काही नाही. अजय देवगण हा केवळ स्वभावानेच तापट नाही तर त्याच्या ट्विटमध्येही विचित्र वागणुकीची प्रचिती येते. केवळ लोकसंख्येतील अनेक लोक हिंदी बोलतात म्हणून ती राष्ट्रभाषा होत नाही. हिंदी ही 9 पेक्षा कमी राज्यांमध्ये प्राथमिक भाषा म्हणून बोलली जाते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बहुतेक राज्यांमध्ये ती दुसरी, तिसरी भाषा म्हणून आहे किंवा तीसुद्धा नाही. अशी परिस्थिती असताना अजय देवगणच्या विधानात तथ्य काय? कन्नड सिनेसृष्टी ही हिंदी चित्रपटसृष्टीला मागे टाकतेय हे अजयने लक्षात घ्यायला हवं. कन्नडिगांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचा विकास झाला. अजय देवगणने हे विसरू नये की त्याचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ बेंगळुरूमध्ये वर्षभर चालला होता.’

अजय आणि किच्चा सुदीप यांच्यातील वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘किच्चा सुदीपने जे सांगितलं ते बरोबर होतं. प्रादेशिक भाषा ही सर्वात महत्त्वाची असते कारण राज्याची निर्मिती भाषिक आधारावरूनच होते. सुदीप जे बोलला ते सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे,’ असं ते म्हणाले.