लग्नात महिलांचा श्वास कोंडतो पण..; आमिर खानच्या पूर्व पत्नीचं वक्तव्य चर्चेत

| Updated on: Apr 08, 2024 | 3:34 PM

आमिर आणि किरणने 2005 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. या दोघांना आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट जाहीर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला. मात्र घटस्फोटानंतरही किरण आणि आमिर यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे.

लग्नात महिलांचा श्वास कोंडतो पण..; आमिर खानच्या पूर्व पत्नीचं वक्तव्य चर्चेत
Kiran Rao and Aamir Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता आमिर खान आणि किरण राव हे 2021 मध्ये विभक्त झाले. लग्नाच्या 15 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण राव घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “लग्नाआधी मी आणि आमिर जवळपास वर्षभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्या, आम्ही आईवडिलांमुळे लग्न केलं”, असं तिने स्पष्ट केलं. जर वैवाहिक आयुष्यात एखाद्या जोडीदाराला गुदमरल्यासारखं वाटत असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही तिने म्हटलंय.

“माझ्या मते आपण या गोष्टीविषयी पुरेसं बोलतच नाही की लग्नात एखाद्या व्यक्तीचा श्वास कसा कोंडू शकतो, विशेषकरून महिलांचं. त्यामुळे तुम्हाला कसं कळू शकेल की त्यात राहून स्वत:साठी मार्ग कसा शोधू शकता? माझ्या मते हा मुद्दा चर्चेचा आणि वादाचा आहे”, असं किरण म्हणाली. यावेळी तिने स्वत:चंही उदाहरण सांगितलं. “आमिर आणि माझ्यात एक व्यक्ती म्हणून खूप तगडं नातं होतं आणि यापुढेही राहील. आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो आणि एकमेकांवर खूप प्रेम करतो. ही गोष्ट आमच्यासाठी कधीच बदलली नाही. मला फक्त स्वतंत्रपणे जगायचं होतं आणि माझ्या विकासासाठी ते महत्त्वाचं होतं”, असं किरणने स्पष्ट केलं.

घटस्फोटानंतर आमिरसोबत असलेल्या नात्याविषयी किरण एका मुलाखतीत म्हणाली, “तुम्ही इतर एक्स कपल्सना पाहिलात तर तेसुद्धा तुम्हाला एकमेकांशी चांगलं वागताना दिसतील. मात्र हे प्रत्येक नात्यात होत नाही. आमीर आणि मी एकत्र काम करतो, एकाच इमारतीत राहतो आणि त्याचं कुटुंब हे त्याच्यापेक्षा जास्त माझं आहे. म्हणूनच आमचं नातं असामान्य आहे असं मला वाटतं.”

हे सुद्धा वाचा

किरण रावला डेट करण्याआधी आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या वर्षभरानंतर 2002 मध्ये आमिर आणि रिना विभक्त झाले. ‘लगान’ या चित्रपटात किरणने सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यामुळेच आमिरने रिनाला घटस्फोट दिला, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तब्बल 22 वर्षांनंतर किरणने या चर्चांवरही मौन सोडलं होतं. एका मुलाखतीत किरणने स्पष्ट केलं की ‘लगान’च्या शूटिंगदरम्यान ती आमिरशी फार क्वचित बोलली होती. चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर 2004 मध्ये आमिर आणि किरण एकमेकांना डेट करू लागले होते.