म्हणून कुणाल कामरा मुंबईत पाऊल ठेवत नाही, वकिलांनी स्पष्टच सांगितलं

कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदी गाण्यामुळे दाखल झालेल्या मानहानीच्या तक्रारीबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कामरा यांच्या वकिलांनी त्यांना मिळालेल्या धमक्या आणि पोलिसांच्या कारवाईतील चुकीचे पैलू न्यायालयासमोर मांडले.

म्हणून कुणाल कामरा मुंबईत पाऊल ठेवत नाही, वकिलांनी स्पष्टच सांगितलं
kunal kamra (1)
| Updated on: Apr 16, 2025 | 5:37 PM

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराविरोधात तक्रार दाखल केली होती. आता ती तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कुणाल कामरा हा चौकशीसाठी मुंबईत का येत नाही, याबद्दल त्याच्या वकिलांनी सविस्तर माहिती दिली.

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विडंबनात्मक गाणे केल्यानंतर त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करताच त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. आता याप्रकरणी कुणाल कामराचे वकील ॲड. नवरोज सीरवी यांनी अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. कुणाल कामरा यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले होते.

राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, त्याची इतिहासात नोंद आहे. कुणाल कामराला “आम्ही तुझे तुकडे करू” अशा आशयाच्या धमकी देण्यात आली होती. या धमक्यांचे फोटो न्यायालयात सादर करण्यात आले. पोलिसांना या धमक्यांची माहिती असूनही ते कामराला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावणी करत आहेत. २०२३ मध्ये अजित पवार यांनीही गद्दार, यांना धडा शिकवला जाईल असे भाष्य केले होते. योगेश कदम यांनी तर कामरा यांनी माफी मागण्यास नकार दिला. याच धर्तीवर मद्रास कोर्टाने कामरा यांना अटकेपासून संरक्षण दिलं. कुणाल कामराने त्याची मत व्यक्त केली होती. शिवसेनेत जे काही घडलं, त्याची सगळ्याची इतिहासात नोंद आहे, असा युक्तीवाद वकील ॲड. नवरोज सीरवी यांनी केला.

आई-वडिलांच्या घरीही गेले आणि त्यांना त्रास दिला

“खार पोलिसांनी कुणाल कामरा यांना लागोपाठ समन्स पाठवले आहेत. त्यांच्या जीवाला धोका असून अनेक धमक्या येत आहेत. हे सर्व माहीत असूनही पोलीस त्यांना समन्स पाठवत आहेत. इतकेच नव्हे, तर पोलीस त्यांच्या आई-वडिलांच्या घरीही गेले आणि त्यांना त्रास दिला”, असा आरोप ॲड. सीरवी यांनी केला.

“धमक्या देण्याची ही कोणती पद्धत आहे? आमच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही, असा याचा अर्थ आहे का? हे खरोखर कायद्याचे राज्य आहे का? नैसर्गिक न्यायतत्त्वाचा आणि भाषण स्वातंत्र्याचा काही अर्थ आहे की नाही? जर चूक झाली असेल, तर कायद्याच्या आधारावर कारवाई करता येत नाही का? स्वतःच्या सत्तेच्या जोरावर, हवे तसे कलम लावून एफआयआर दाखल केले जाते का?” असा प्रश्नही ॲड. सीरवी यांनी उपस्थित केला.

“कुणाल कामराला धमक्या”

“पोलीस वारंवार कुणाल कामरा यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स पाठवत आहेत. परंतु कामरा पहिल्या दिवसापासून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यास तयार आहे. त्याने याबाबत पोलिसांना वेळोवेळी कळवलं आहे. कुणालला जवळपास 500 पेक्षा जास्त धमक्या दिल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या आहेत. मुरजी पटेल यांनी खुलेआम पोस्टर लावून कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागण्यास अल्टीमेंटम दिला होता. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी असल्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला. शिवसेनेचे राहुल कनाल यांनी कामराचं मुंबईत शिवसेना स्टाइलमध्ये स्वागत केलं जाणार, अशी धमकी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील पोलिसांनी कामराला पकडून त्याच्या आयुष्याची कॉमेडी करायला हवी असं वक्तव्य केलं होतं.” असेही वकील ॲड. नवरोज सीरवी यांनी म्हटले.