Maa Movie Review : ट्विस्ट अँड टर्न्सने परिपूर्ण अशी नवी कथा, नवा प्रयत्न; काजोलचा ‘माँ’ कसा आहे?
अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका असलेला 'माँ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मायथोलॉजिकल हॉरर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये बघायचा विचार करत असाल तर आधी हा रिव्ह्यू वाचा..

‘स्त्री’ आणि ‘मुंज्या’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर हॉरर कॉमेडी चित्रपट बनवण्यावर अनेकांचा भर आहे. परंतु काजोलचा ‘माँ’ हा चित्रपट त्याच शर्यतीतला नाही. हा एक मायथोलॉजिकर हॉरर चित्रपट आहे. अजय देवगण आणि आर. माधवन यांच्या ‘शैतान’ युनिव्हर्समधला हा एक चित्रपट आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाला आहे. ‘माँ’च्या दमदार ट्रेलरनंतर प्रेक्षकांच्या मनात कथेविषयी खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या अपेक्षांवर हा चित्रपट काही अंशी खरा उतरला आहे, असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट तुम्हाला घाबरवण्यात फारसा यशस्वी ठरत नाही. परंतु तरीही त्यात अशी काही गोष्ट आहे, ज्यासाठी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकता.
कथा
ही कथा आहे पश्चिम बंगालमधल्या चंद्रपूर नावाच्या एका जागेची. इथे एका कुटुंबात मुलगी जन्मताच तिचा बळी दिला जातो. यामागची कथा काय आहे, या कुटुंबाला कोणता शाप मिळाला आहे, याची रंजक कथा त्यात दाखवण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा त्याच कुटुंबात काजोल तिच्या मुलीसोबत राहायला जाते, तेव्हा एक राक्षस तिला आणि गावातील इतर मुलींना कशा पद्धतीने गायब करतो, आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी एक आई काय करते.. हे सर्व याच पहायला मिळतं.
कसा आहे चित्रपट?
या चित्रपटाच्या कथेची गती ठीकठाक आहे, असं म्हणावं लागेल. कथेच बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. त्यातली गुपितं काय आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. या चित्रपटातील व्हीएफएक्स चांगले आहेत आणि शेवटची दहा मिनिटं कमालीची आहेत. हा चित्रपट त्याच्या ट्रेलरइतका दमदार नाही आणि इतका वाईटही नाही. याला एक चांगला चित्रपट म्हणू शकतो. यातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दिसतो आणि त्यात काही प्रमाणात निर्माता-दिग्दर्शकांना यश मिळालं आहे. परंतु यामध्ये हॉररचा डोस काहीसा कमी पडल्याचं दिसून येतं. तुम्ही जर ट्रेलर पाहून अत्यंत हॉरर चित्रपट आहे म्हणून आवडीने थिएटरमध्ये जात असाल, तर कदाचित तुमची निराशा होऊ शकते. पंरंतु मायथोलॉजिकल कथा रंजक असल्याने तुम्हाला मजा येऊ शकते. एकंदरीत काजोलचा हा चित्रपट ‘वन टाइम वॉच’ आहे, असं म्हणायला हरकत नाही.
अभिनय
अभिनेत्री काजोलने आईच्या भूमिकेत सर्वस्व ओतल्याचं दिसून येतं. तिने चित्रपटात कमालीचा अभिनय केला आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी एखादी आई कोणत्याही थराला जाऊ शकते, या भावना तिने पडद्यावर खूप चांगल्याप्रकारे दाखवल्या आहेत. यामध्ये रॉनित रॉयने खलनायकी भूमिका साकारली आहे. तर काजोलच्या पतीच्या भूमिकेत इंद्रनील सेनगुप्ताने चांगलं काम केलंय. याशिवाय दिव्येंदु भट्टाचार्यने बंगाली भूमिकेत चोख परफॉर्मन्स दिला आहे. चित्रपटात खेरीन शर्माने काजोलच्या मुलीची भूमिका साकारली असून तिनेही उल्लेखनीय काम केलंय. तर सुरजसिखा दास या नव्या अभिनेत्रीने विशेष छाप सोडली आहे.
लेखन आणि दिग्दर्शन
विशाल फुरियाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या कथेत आणखी हॉरर एलिमेंट्सची गरज आहे, असं जाणवतं. काही प्रश्न अनुत्तरितच राहतात आणि काही गोष्टी विचित्रही वाटतात. त्या गोष्टी अशा का आहेत, याचं उत्तर चित्रपट पाहताना मिळत नाही. दिग्दर्शनाच्या बाबतीत आणखी चांगलं काम केलं जाऊ शकलं असतं. तर अजित जगताप, आमिर कियान खान आणि सैयान कॉड्रास यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.
