एकेकाळी माधुरी दीक्षितला दिलेली टक्कर, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री; लोकप्रिय अभिनेत्रीची आता कामासाठी विनवणी

एकेकाळी माधुरी दीक्षितला टक्कर देणारी ही अभिनेत्री आता कामाच्या शोधात आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने काम देण्याची मागणी केल आहे. लग्नानंतर ही अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक झाली होती. ती आता मुंबईत परतली आहे.

एकेकाळी माधुरी दीक्षितला दिलेली टक्कर, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री; लोकप्रिय अभिनेत्रीची आता कामासाठी विनवणी
Madhuri Dixit and Meenakshi Seshadri
Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 3:31 PM

नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ जिच्या केवळ आवाजाने संपूर्ण चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, ती आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही टक्क दिली होती. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मिनाक्षी शेषाद्री आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने कामाची मागणी केली आहे. यावेळी तिने स्पष्ट केलंय की तिला मुख्य भूमिकेची अपेक्षा नाही. भूमिका छोटी पण प्रभावी असेल तर ती साकारायला मी तयार आहे, असं मिनाक्षी म्हणाली आहे.

इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये मिनाक्षी म्हणतेय, “तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल, सततच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी मनापासून आभार मानते. तीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मी माझ्या मूळ घरी मुंबईला परतले आहे. उत्साह, प्रचंड आशा आणि सकारात्मक विचारांसह मी पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात कमबॅक करू इच्छिते. मुख्य भूमिका असो, सहाय्यक असो किंवा अगदी छोटी भूमिका असो.. माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पात्र सशक्त असलं पाहिजे. चित्रपट असो किंवा ओटीटी शोज.. मला अशा भूमिका साकारायच्या आहेत, ज्या एक अभिनेत्री म्हणून मला आव्हान देतील.”

“मी इथे कोणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी आलेली नाही. माझ्या कुटुंबाच्या प्रेमाच्या आणि प्रोत्साहनाच्या जोरावर जे मला खरंच आनंद देतं, तेच मी करत आहे. तुम्ही माझ्यावर प्रेमाचा असाच वर्षाव करत राहा”, असं तिने या व्हिडीओच्या शेवटी म्हटलंय. एकेकाळी मिनाक्षी शेषाद्री ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक होती. वयाच्या 17 व्या वर्षी तिने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने हिंदीसह तेलुगू, तमिळ चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने स्वत:ची ओळक निर्माण केली. मात्र 1996 मध्ये ‘घायल’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर तिने बॉलिवूडला रामराम केला. लग्नानंतर तिने पतीसोबत मुंबईत सोडली आणि अमेरिकेत स्थायिक झाली.

अमेरिकेत 30 वर्षे तिने तिच्या कौटुंबिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं. आता ती तिच्या कर्मभूमीमध्ये म्हणजेच मुंबईत परतली आहे. मिनाक्षीने असंही सांगितलं की तिला अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या, मात्र ते तितकेसे खास नव्हते. तर त्यापैकी काही जमलेच नाहीत.

Follow Us