Radhe Shyam Review: प्रभासचा बिग बजेट चित्रपट कथेच्या बाबतीत ठरला कमकुवत!

| Updated on: Mar 11, 2022 | 3:22 PM

Radhe Shyam Review: अनेकदा चित्रपटांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, बजेटच्या नावाखाली नवनवीन रेकॉर्ड्स बनवले जातात, प्रमोशनही अशा पद्धतीने केलं जातं की आजपर्यंत असं कधीच पाहिलं नसेल.

Radhe Shyam Review: प्रभासचा बिग बजेट चित्रपट कथेच्या बाबतीत ठरला कमकुवत!
Radhe Shyam Review
Image Credit source: Instagram
Follow us on

Radhe Shyam Review: अनेकदा चित्रपटावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, बजेटच्या नावाखाली नवनवीन रेकॉर्ड्स बनवले जातात, प्रमोशनही अशा पद्धतीने केलं जातं की आजपर्यंत असं कधीच पाहिलं नसेल. साहजिकच, जर तुम्ही जास्त पैसे गुंतवलेत तर तंत्रज्ञान, VFX यांसारख्या गोष्टी उत्तम दर्जाच्या होतील. पण चित्रपटाची कथा दमदार नसेल, तर प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणं अवघड होतं. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या (Prabhas) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाबाबत असंच काहीसं झालंय. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. तब्बल 350 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. मात्र निर्मात्यांनी हे पैसे नेमके कुठे खर्च केले हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कथा-

राधे श्याम ही अशा दोघांची प्रेमकहाणी आहे, ज्यांना त्यांच्या हातावरील रेषा कधीच एकमेकांना भेटू देऊ शकत नाहीत. ज्यांचं नशीब नेहमीच एकमेकांपासून वेगळं करण्याचा कट रचतो. विक्रम आदित्य (प्रभास) आणि प्रेरणा (पूजा हेगडे) यांची ही प्रेमकहाणी आहे. विक्रम हा हाताच्या रेषा पाहून भविष्य सांगतो. त्याने सांगितलेलं भविष्य कधीच चुकत नाही, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. पुढे काय होणार हे त्याला आधीच माहीत असतं. याच शक्तीमुळे विक्रमला समजतं, की त्याच्या आयुष्यात प्रेम कधीच येऊ शकत नाही. दुसरीकडे, प्रेरणा ही व्यवसायाने डॉक्टर आहे आणि तिचा या भविष्यवाणीवर विश्वास नाही. हे संपूर्ण चित्रपटाचं कथानक आहे. एक हाताच्या रेषांनाच जीवनाचं सत्य मानतो तर दुसरी फक्त तिच्या कर्मावर विश्वास ठेवते. चित्रपटात मधेच इतरही अनेक घटना आहेत. दोघंही प्रेमात पडतात, पण एकाला ते प्रेम कळत नाही, तर दुसरा ते प्रेम मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार होतो. आता हातावरच्या रेषांनी सांगितलेलं भविष्य खरं ठरतं, की प्रेरणाच्या विचारांचा विजय होतो, हे दोघं एकत्र येऊ शकतात की नाही, विक्रमचा अंदाज खरा ठरेल की खोटा, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.

फक्त बजेट मोठा..

प्रभासचा 2017 मध्ये ‘साहो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचंही बजेट 350 कोटी रुपये होतं. राधेश्यामचं बजेटही इतकंच आहे. साहोमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स पहायला मिळतील, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्ये असतील असं म्हटलं जात होत. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. आताही राधेश्यामच्या सेटवर अमाप पैसा खर्च करण्यात आला आहे. मात्र कथेशिवाय हा चित्रपट निर्जीव वाटतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक फक्त कथेच्याच शोधात राहील.

चित्रपटाचा पूर्वार्ध संथ आहे. विक्रम हा भारताचा नंबर 1 पामिस्ट (हातावरील रेषा पाहून भविष्य सांगणारा) आहे असं फक्त सांगण्यात आलं आहे. काही लोक त्याच्याकडे भविष्य विचारायला येतात, अगदी इंदिरा गांधीसुद्धा.. आश्चर्यचकित होऊ नका. जेव्हा चित्रपटाचा उत्तरार्ध येतो, तेव्हा संथ कथेत नैराश्याचीही भर पडते. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणं, या चित्रपटाला जमत नाही.

प्रभासने केली निराशा

कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘बाहुबली’ची जादू या चित्रपटात फिकी पडली. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसुरी अभिनय वाटतो. विशेष म्हणजे प्रभासनेच हिंदी डबिंगही केलं आहे. पण त्याच्या उच्चारांमध्येही एकसुरीपणा जाणवतो. पूजा हेगडे ही राधे श्यामची मुख्य अभिनेत्री आहे. तिनंही जेमतेम काम केलं आहे. प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री फारशी रंगलेली नाही. लार्जर दॅन लाइफ लव्हस्टोरी बनवण्याचा निर्मात्यांनी प्रयत्न केला. पण कथेच्या अभावामुळे तो कमकुवत पडला. त्यामुळे पूजाही फारसा प्रभाव टाकू शकली नाही. या चित्रपटात भाग्यश्री, सचिन खेडेकर आणि जगपती बाबू अशी इतर काही मोठी नावंदेखील आहेत. पण या चित्रपटाच्या कथेला कोणताच पात्र गती देऊ शकला नाही.

कुठे झाली चूक?

राधेश्यामची कथा अनेकदा भरकटली आहे. क्रिएटिव्ह लिबर्टी आणि लार्जर दॅन लाइफ दाखवण्याचा प्रयत्न करूनसुद्धा काही गोष्टींवर प्रेक्षकांचा विश्वास बसत नाही. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडणं, हे खटकतं. या चित्रपटाची कथा लिहायला बरीच वर्षे लागली, असं राधाकृष्ण कुमार यांनी सांगितलं होतं. मात्र कथेत केवळ गुंताच दिसतो आणि त्याला कोणताही प्रवाह नसल्याचं जाणवतं. या कमकुवत कथेचा सिनेमॅटोग्राफर मनोज परमहंस यांच्या कामावरही परिणाम झाल्याचं दिसतं. त्यांनी अप्रतिम दृश्य टिपले आहेत. पण कथेतच ताकद नसल्यामुळे चित्रपटाचा हा पैलूही अयशस्वी ठरतो.

हेही वाचा:

“सहा बोटं असलेल्यांचा..”; भर कार्यक्रमात कंगनाने हृतिकवर साधला निशाणा

“आमचं लग्न टिपिकल नव्हतं..”; रेणुका शहाणेंनी सांगितला आहेराचा किस्सा