समंथामुळे गप्प होतो, पण…; घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य

समंथा आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाविषयी तेलंगणाच्या मंत्र्या कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर आता नाग चैतन्यने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याआधी नागार्जुन आणि समंथानेही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

समंथामुळे गप्प होतो, पण...; घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य
Samantha and Naga Chaitanya
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 03, 2024 | 1:40 PM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोघं लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. नाग चैतन्यने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा आणि नाग चैतन्यच्या घटस्फोटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. या दोघांच्या घटस्फोटाला बीआरएस अध्यक्ष केटी रामा राव कारणीभूत आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नाग चैतन्यचे वडील नागार्जुन आणि समंथा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता नाग चैतन्यनेही या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

नाग चैतन्यची पोस्ट-

‘घटस्फोटाचा निर्णय हा आयुष्यातील सर्वांत वेदनादायक आणि दुर्दैवी निर्णयांपैकी एक आहे. बराच विचार केल्यानंतर मी आणि माझ्या पूर्व जोडीदाराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आयुष्यातील आमच्या वेगवेगळ्या ध्येयांमुळे आणि एकमेकांप्रती आदर-सन्मान बाळगत दोन प्रौढ लोकांप्रमाणे आम्ही एकमेकांच्या हितासाठी शांततेने घेतलेला हा निर्णय होता. मात्र याबाबत आता अत्यंत निराधार आणि हास्यास्पद गॉसिप होत आहेत. माझ्या पूर्व जोडीदाराबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल असलेल्या आदरापोटी मी आतापर्यंत मौन बाळगलं होतं. आज मंत्री कोंडा सुरेखा यांनी केलेला दावा फक्त खोटाच नाही तर निव्वळ हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. महिलांना पाठिंबा आणि सन्मान मिळायला हवा. केवळ प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांचा गैरफायदा घेणं आणि शोषण करणं हे लज्जास्पद आहे,’ असं नाग चैतन्यने लिहिलंय.

नेमकं काय म्हणाल्या के. सुरेखा?

“केटीआर यांच्यामुळेच 100 टक्के नाग चैतन्यचा घटस्फोट झाला आहे. कारण एन. कन्वेन्शन हॉलवर हातोडा पडू नये म्हणून तुम्हाला समंथाला माझ्याकडे पाठवावं लागलं होतं. नागार्जुन यांनी समंथाला केटीआर यांच्याकडे जाण्यास भाग पाडलं होतं आणि ते म्हणाले, एकतर तू (समंथा) आमचं म्हणणं ऐक किंवा घटस्फोट दे. त्यामुळेच हा घटस्फोट झाला. संपूर्ण इंडस्ट्रीला याबद्दल माहीत आहे”, असं कोंडा सुरेखा यांनी म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us