“आई आणि ऋषी कपूर यांच्यामुळे मला कधीच मोकळेपणे..”, नीतू कपूर यांच्याकडून खुलासा

नीतू कपूर आणि झीनत अमान यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नीतू कपूर बऱ्याच मुद्द्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. ऋषी कपूर यांना डेट करताना त्यांनी बरेच निर्बंध लादल्याचा खुलासा नीतू कपूर यांनी यावेळी केला.

आई आणि ऋषी कपूर यांच्यामुळे मला कधीच मोकळेपणे.., नीतू कपूर यांच्याकडून खुलासा
Rishi Kapoor and Neetu Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 11, 2024 | 9:24 AM

मुंबई : 11 जानेवारी 2024 | अभिनेत्री नीतू कपूर यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत झीनत अमानसुद्धा उपस्थित होत्या. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या या शोमध्ये दोघींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या गप्पांदरम्यान नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. ऋषी कपूर हे ‘स्ट्रिक्ट बॉयफ्रेंड’ होते, असंही त्यांनी सांगितलं. यश चोप्रा यांच्यासोबत काम करताना अनेकदा पार्ट्या केल्या जायच्या, पण ऋषी कपूर यांनी कधीच रात्री उशिरापर्यंत पार्टी करण्याची परवानगी दिली नव्हती, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.

याविषयी बोलताना नीतू कपूर म्हणाल्या, “आम्ही खूप चांगला वेळ घालवला, विशेषकरून यशजींसोबत (यश चोप्रा). आम्ही रात्री पार्टी करायचो, अंताक्षरी आणि विविध खेळ खेळायचो. शूटिंगदरम्यान ते जणू पिकनिकसारखंच वाटायचं. तेव्हा खूप मज्जा यायची. पण त्यावेळी ऋषी कपूर हे माझे बॉयफ्रेंड होते. त्यामुळे मी पार्ट्यांचा खरा आनंद कधीच घेतला नाही. कारण ते नेहमी मला बोलायचे की हे करू नको, ते करू नको, घरी लवकर ये. त्यामुळे त्याकाळी मी कधीच पार्ट्यांचा खरा आनंद घेतला नाही. मी त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये कमिटेड होते. माझी आई स्वभावाने कठोर होती आणि मला बॉयफ्रेंडसुद्धा तसाच भेटला होता. त्यामुळे त्या दोघांमध्ये मला मोकळेपणे काहीच करता आलं नाही.”

13 एप्रिल 1979 रोजी नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी साखरपुडा केला. साखरपुड्याआधी दोघं काही काळ एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 22 जानेवारी 1980 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नीतू कपूर या अभिनयविश्वापासून दूर गेल्या. नीतू आणि ऋषी यांना दोन मुलं आहेत. रिधिमा असं त्यांच्या मुलीचं नाव असून रणबीर कपूर हा त्यांचा मुलगा आहे. लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर नीतू कपूर यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष कुटुंबाकडे दिलं.

ऋषी कपूर यांना ल्युकेमियाचं निदान झालं आणि जवळपास दोन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये काही काळ उपचार झाले. त्यावेळी नीतू आणि रणबीर त्यांच्यासोबत होते. त्यावेळी आलिया भट्टसुद्धा त्यांची भेट घ्यायला न्यूयॉर्कला जायची. 2019 मध्ये तिघं भारतात परतले, मात्र त्याच्या काही काळानंतर ऋषी कपूर यांचं निधन झालं. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us