१४ तास बेशुद्ध, बीपी लो… बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

१४ तास बेशुद्ध, बीपी लो... बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2025 | 12:56 PM

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायम चर्चेत असतात. त्यांनी आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. एक काळ तर असा होता की लोक अमिताभ यांचा सिनेमा पाहण्यासाठी तुफान गर्दी करत असत. बिग बींचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण एका चित्रपटाच्या सेटवर बिग बींना गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर १४ तास शस्त्रक्रिया सुरु होती. त्यांचे बीपी लो झाले होते. डॉक्टरांनी तर बिग बींना मृत घोषीत केले होते. मात्र, दैवी चमत्कार झाला असे म्हणायला हरकत नाही. बिग बींचा जीव वाचला. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…

अमिताभ बच्चन यांना एकदा त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुली’च्या सेटवर गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ‘क्लिनिकली मृत’ घोषित करण्यात आले होते. कुलीच्या सेटवर हा अपघात झाला. हा सिनेमा तर ब्लॉकबस्टर ठरला होता पण बिग बींसोबत झालेल्या अपघातमुळे त्याची जोरदार चर्चा रंगली होती. या सिनेमाच्या सेटवर झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. पुनित इस्सारसोबतच्या फाईटींग सीन दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी चुकीच्या वेळी उडी मारली. ते टेबलच्या काठावर जाऊन आदळले होते. ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

अमिताभ यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. एक वेळ अशी आली की त्यांचे बीपी एकदम लो झाले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. ज्यामुळे त्यांचे जवळचे मित्र राजीव गांधी आणि सामान्य लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. देशभरातील चाहत्यांनी अमिताभ यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली. काहींनी उपवास केले, तर काही जण चमत्काराच्या आशेने अनवाणी पायांनी मंदिरात गेले होते.

अनेक वर्षांनंतर सिमी गरेवालच्या मुलाखतीत, अमिताभ बच्चन यांनी वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केल्याच्या भयानक अनुभवाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, अपघातामुळे त्यांच्या आतड्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे ते कोमात गेले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांना बॉम्बेला नेण्यात आले होते. पण टाके तुटल्यावर गुंतागुंत निर्माण झाली. त्यामुळे ऑपरेशन करावे लागले होते. या दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर बिग बी 12-14 तास बेशुद्ध होते. त्यांची नाडी जवळपास बंद झाली आणि बीपी कमी झाले होते. त्यावेळी डॉक्टरांना वाटले की ते बिग बींना वाचवू शकत नाहीत. पण, जया बच्चन यांनी हार मानली नव्हती. त्यांनी आशा कायम ठेवली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us