हिना खानने ‘ये रिश्ता..’ मालिका का सोडली? 8 वर्षांनंतर सत्य आलं समोर

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अभिनेत्री हिना खानने सहा वर्षे अक्षराची भूमिका साकारली होती. मात्र तिने अचानक मालिका का सोडली, याचा खुलासा आता मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी केली.

हिना खानने ये रिश्ता.. मालिका का सोडली? 8 वर्षांनंतर सत्य आलं समोर
Rajan Shahi, Shivangi Joshi and Hina Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 29, 2024 | 10:04 AM

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये फार लोकप्रिय आहे. या मालिकेच्या कथानकात अनेकदा लीप आले, त्यातील मुख्य कलाकारांसह इतरही कलाकार बदलले, तरी मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. मार्च महिन्यात ही मालिका त्यातील मुख्य कलाकारांमुळे चर्चेत आल होती. कारण दिग्दर्शक आणि निर्माते राजन शाही यांनी शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे या दोन मुख्य कलाकारांनाच मालिकेतून तडकाफडकी काढून टाकलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्याचप्रमाणे या मालिकेची सुरुवात ज्या अभिनेत्रीपासून झाली, ती म्हणजे हिना खान. तिचा करारसुद्धा अचानक संपवल्यामागचं खरं कारण त्यांनी सांगितलं. हिना खानने सहा वर्षे या मालिकेत भूमिका साकारली होती.

हिना खानच्या एग्झिटबद्दल बोलताना राजन यांनी सांगितलं की ती स्क्रिप्टमध्ये खूप ढवळाढवळ करायची. “सेटवर हिनामुळे असे अनेक किस्से घडले, ज्यामुळे वाद निर्माण झाला आणि सेटवरील वातावरण खराब झालं. अखेर वाहिनीला आम्हा दोघांसोबत मीटिंग करावी लागली. एके दिवशी शूट सुरू असताना हिनाने काही डायलॉग्स बोलण्यास नकार दिला. हे डायलॉग्स मालिकेत नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशीचं कौतुक करणारे होते. हिनाचा अहंकार मध्ये आला आणि तिने ते म्हणण्यास नकार दिला. त्यावेळी मी तिला सांगितलं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्यावरही तिने नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा”, असा खुलासा त्यांनी केला.

“त्यादिवशी ती पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसली होती. रात्री जेव्हा ती सेटवरून गेली, तेव्हा तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेटवर यायची गरज नाही. तिचा करार रद्द करण्यात आला आहे. तरीही दुसऱ्या दिवशी ती सेटवर आली आणि तिने काही सीन्स शूट केले. पण मला माझा निर्णय मागे घ्यायचा नव्हता. म्हणून पॅकअप करताना तिला मालिका सोडण्यास सांगितलं गेलं”, असं ते पुढे म्हणाले.

हिना खानने मालिका सोडल्यानंतर तिने शिवांगीसोबत शूट केलेले सहा सीन्स काढून टाकण्यात आले. हिनाच्या एग्झिटनंतर पुढील तीन दिवसांत मालिकेच्या टीमने त्यांच्या हिशोबाने शूटिंग पूर्ण केलं. यामुळे मालिकेच्या टीआरपीमध्ये बरीच वाढ झाल्याचंही राजन शाही यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us