मी इतका नीच, हलकट नाही की..; थलपती विजय यांच्याबद्दलच्या चर्चांवर रजनीकांत स्पष्टच बोलले

थलपती विजय यांच्याबद्दल मत्सर वाटत असल्याच्या चर्चांवर अखेर रजनीकांत यांनी मौन सोडलं आहे. रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी अफवांवर रोखठोक उत्तर दिलं आहे. यावेळी ते एम. के. स्टॅलिन यांच्या भेटीबद्दलही व्यक्त झाले.

मी इतका नीच, हलकट नाही की..; थलपती विजय यांच्याबद्दलच्या चर्चांवर रजनीकांत स्पष्टच बोलले
रजनीकांत, थलपती विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 1:18 PM

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी सकाळी त्यांच्या पोएस गार्डन इथल्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ते थलपती विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या यशावर नाराज असल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांवर आता त्यांनी मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीसंदर्भात त्यांच्याबद्दल पसरलेल्या अनेक अफवांमुळेच ही पत्रकार परिषद घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, “जर मी या अफवांना उत्तर दिल नाही, तर त्या खऱ्या मानल्या जातील. निवडणुकीच्या निकालानंतर मी एम. के. स्टॅलिन यांना भेटायला गेलो होतो. हा टीकेचा विषय बनला. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. एम. के. स्टॅलिन कुलथूरमधून हरले याचं मला दु:ख आहे,” असं रजनीकांत म्हणाले.

विमानतळावर अभिनंदन का केलं नाही?

रजनीकांत यांच्यावर असाही आरोप होता की ते तमिळगा वेत्री कझमग (टीव्हीके) पक्षाच्या विजयानंतर त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं नाही. याविषयी ते म्हणाले, “विजय मुख्यमंत्री होऊ नये असं मी म्हणाल्याच्या किंवा मी दोन पक्ष विलीन करण्याचा प्रयत्न करत होतो, अशा अफवा पसरू लागल्या होत्या. काही लोक म्हणत आहेत की मी विमानतळावर त्यांचं अभिनंदन केलं नाही. पण वास्तव हेच आहे की मी त्यांचं अभिनंदन केलं होतं. विजय मुख्यमंत्री होताच मी त्यांचं अभिनंदन केलं होतं.”

विजय यांच्याबद्दल स्पष्टच म्हणाले रजनीकांत..

“रजनीकांत काही नीच किंवा हलकट माणूस नाही की जो एखाद्या गोष्टीवर विनाकारण टिप्पणी करेल. मी राजकारणात नाही, मग विजयचा हेवा का बाळगावा? माझी त्याच्यावर ईर्षा का असेल? विजय आणि माझ्यात 25 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट मला त्यांचा आनंदच आहे. विजय यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 52 वर्षांत त्यांनी एमजीआर आणि एनटीआर यांच्यापेक्षाही जास्त यश मिळवलं आहे. त्यांनी केंद्रा भाजपविरुद्ध आणि इथे इतर दोन पक्षांविरुद्ध निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. हा माझ्यासाठी एक सुखद आणि आश्चर्यकारक अनुभव होता”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

राज्यपालांसमोर जेव्हा टीव्हीके पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत होता तेव्हा रजनीकांत यांनी कोणतीच टिप्पणी केली नाही आणि नंतर विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नाहीत, असेही आरोप त्यांच्यावर झाले. याविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच रजनीकांत थेट म्हणाले, “मी कधीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो नाही. तुम्ही मला कधी माजी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यांमध्ये पाहिलंय का?” यावेळी त्यांनी 2021 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकांसंदर्भातही वक्तव्य केलं. ते म्हणाले, “जर मी 2021 मध्ये निवडणूक लढवली असती, तर मी जिंकलो असतो. “

Follow Us