Sunil Lahri: भावनेच्या भरात चूक झाली.., ‘रामायण’ फेम सुनील लहरी यांनी मागितली माफी; राखीच्या व्हिडीओवरून वाद
Sunil Lahri: 'रामायण' मालिकेतील अभिनेते सुनील लहरी यांनी रक्षाबंधनच्या दिवशी शेअर केलेल्या एका व्हिडीओबद्दल माफी मागितली आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी त्यांना आपला भाऊ समजून राखी बांधताना दिसतेय.

Sunil Lahri: ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर केलेल्या एका व्हिडीओवरून त्यांच्यावर टीका झाली. या टीकेनंतर सुनील लहरी यांनी स्वतः एक व्हिडीओ शेअर करत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. ‘भावनेच्या भरात चूक झाली’, असं म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
रक्षाबंधनाच्या व्हिडीओत नेमकं काय होतं?
रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुनील लहरी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये एका मुलीने त्यांना राखी बांधली होती. ही मुलगी अनेक वर्षांपासून फळं विकण्याचं काम करते आणि तिला भाऊ नसल्याचं सुनील यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तिने त्यांना भाऊ मानून राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. व्हिडीओमध्ये ती मुलगी सुनील लहरी यांचे पाय स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेताना दिसली. त्यानंतर त्यांनी तिला शगुन म्हणून पैसे दिले. सुनील यांचा उद्देश या माध्यमातून माणुसकीचा आणि भावाबहिणीच्या नात्याचा संदेश देण्याचा होता. मात्र, व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं, तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओवर प्रश्न उपस्थित केले.
पहा व्हिडीओ-
भावुक होकर भावनाओं में बहकर आप कुछ गलती कर बैठते हैं लेकिन आपके भाव सही हैं तो गलती की माफी भी हो सकती है जैसा मेरे साथ हुआ राखी वाले दिन
At times,1 get emotional carried away by ur feelings n end up making a mistake, but if ur intention is right,then the mistake can be forgiven pic.twitter.com/Fn4c0oRvkz— Sunil lahri (@LahriSunil) September 2, 2026
या व्हिडीओतील आणखी एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष गेलं. राखी डाव्या हातावर बांधण्यात आल्याने काही लोकांनी सुनील लहरींवर टीका केली. सामान्यतः रक्षाबंधनाच्या दिवशी राखी उजव्या हातावर बांधण्याची प्रथा असल्याचं सांगत अनेकांनी कमेंट्स केल्या. या प्रतिक्रियांनंतर सुनील लहरी यांनी स्पष्टीकरण देण्याचा निर्णय घेतला. वाद वाढल्यानंतर सुनील लहरी यांनी एक्सवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी कबूल केलं की, भावनेच्या भरात काही चुका होऊ शकतात. त्या मुलीची परिस्थिती पाहून आपण भावूक झालो होतो, असं त्यांनी सांगितलं. लहानपणीच आई-वडिलांना गमावलेल्या आणि भाऊ नसलेल्या एका मुलीने आपल्याला भाऊ मानून राखी बांधल्यामुळे आपण भावनाविवश झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सुनील लहरी सोशल मीडियावर सक्रिय असून विविध सामाजिक आणि समकालीन मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करताना दिसतात. ‘रामायण’मधील लक्ष्मणाच्या भूमिकेमुळे सुनील लहरी आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टकडे चाहत्यांचं आणि नेटकऱ्यांचं लक्ष असतं.