आता मुंबई-पुण्याला बिनधास्त वडापाव, बाकरवडी खायला जा… वैष्णव यांच्याकडून मुंबई- पुणे बुलेट ट्रेनची घोषणा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-पुणे बुलेट ट्रेनची घोषणा केली आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास अत्यंत वेगवान होणार असून, दिवसातून दोनदा वडापाव किंवा बाकरवडी खाण्यासाठी जाता येईल. तसेच, मुंबईसाठी 238 नवीन एसी लोकलला मंजुरी दिली असून, 2027 पर्यंत पहिली एसी लोकल धावेल. प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे दरम्यान लवकरच बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. आता दिवसातून दोनदा मुंबईला वडापाव आणि पुण्याला बाकरवडी खाण्यासाठी जाता येईल, असा कॉरिडोअर आम्ही तयार करत आहोत, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांनी मीडियाशी बोलताना ही खूश खबर दिली आहे. मुंबई-पुणे दरम्यान बुलेट ट्रेन सुरू झाल्याने पुणे आणि मुंबईकरांना प्रवासासाठी लागणारा वेळ प्रचंड कमी होणार आहे.
निवडणुकीच्यावेळी मी गणपतीत 300 पेक्षा अधिक स्पेशल ट्रेन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. यंदा आम्ही 350 स्पेशल ट्रेन सुरू करत आहोत. गरज भासल्यास आम्ही आणखी 20 स्पेशल ट्रेन सुरू करणार आहोत, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच मुंबईसह परिसरात रेल्वेची 18 हजार कोटींची कामे सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सव्वा तीन तासात प्रवास
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचे काम रोखले होते. परंतु ते गेल्यानंतर बुलेट ट्रेनचे काम वेगाने काम सुरू आहे. मुंबईत वडापाव आणि पुण्यात जावून बाकरवाडी खाण्यासाठी आपण दिवसांतून दोनदा जावू असा कॅारीडॅार बनवत आहोत. तसेच मुंबई ते हैद्राबाद दरम्यान सव्वातीन तासात प्रवास होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
मुंबईला देणार एसी लोकल
मुंबईतील सिग्नल यंत्रणा अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. लोकलना स्वयंचलित दरवाजे बसवण्यावर आमची प्राथमिकता आहे. मुंबईत नव्या 238 एसी लोकलला मान्यता दिली आहे. रेल्वे बोर्डाने तसे आदेश दिले आहेत. 2027 मध्ये यातील पहिली एसी लोकल येईल. त्यानंतर 2030 पर्यंत सर्व एसी लोकल मुंबईत धावतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
15 डब्याच्या लोकल वाढवणार
मुंबईत सध्या 3200 लोकलच्या फेऱ्या होतात. त्या आम्ही 3500 पर्यंत नेणार आहोत. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा आणि लोकलमधील गर्दी कमी व्हावी म्हणून आम्ही 15 डब्यांच्या लोकलही वाढवत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
वैष्णव यांचे आभार
दरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी मुंबई-पुणे बुलेट ट्रेनची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. ही रेल्वेसेवा सुरू केल्याबद्दल अश्विनी वैष्णव यांचे मी आभार मानतो. न होणारी कामेही ते करत आहेत. कोणवासियांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीला जोडणारी ही रेल्वे आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
