मला आजही पश्चात्ताप..; ऋषी कपूर यांच्याविषयी रणबीर व्यक्त, सांगितलं निधनानंतर न रडण्यामागचं कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूर त्याच्या वडिलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. वडिलांच्या निधनानंतर मी रडलो नाही, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे एका गोष्टीची खंत आजही असल्याचं त्याने सांगितलं.

मला आजही पश्चात्ताप..; ऋषी कपूर यांच्याविषयी रणबीर व्यक्त, सांगितलं निधनानंतर न रडण्यामागचं कारण
रणबीर आणि ऋषी कपूर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2024 | 10:18 AM

एप्रिल 2020 मध्ये अभिनेते ऋषी कपूर यांची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर वडिलांसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऋषी कपूर हे अंतिम घटका मोजत आहेत, तेव्हा रुग्णालयातच पॅनिक अटॅक आल्याचा खुलासा रणबीरने केला. रणबीरने निखिल कामतच्या पॉडकास्ट मुलाखतीत याविषयी सांगितलं. “माझं वडिलांवर प्रेम होतं, पण आमचं नातं फार काही चांगलं नव्हतं”, असं तो म्हणाला.

“मी खूप आधीच रडणं बंद केलं होतं. माझ्या वडिलांच्या निधनानंतरही मी रडलो नव्हतो. जेव्हा मी रुग्णालयात त्यांच्यासोबत थांबलो होतो, तेव्हा डॉक्टरांनी येऊन सांगितलं की, ही त्यांची अखेरची रात्र आहे आणि त्यांची प्राणज्योत कधीही मालवू शकते. त्यावेळी मी त्यांच्या रुममध्ये गेलो होतो. त्यांना पाहून मला पॅनिक अटॅक आला. स्वत:ला व्यक्त कसं करायचं हे मला कळत नव्हतं. कारण एकाच वेळी बऱ्याच गोष्टी घडत होत्या. पण मी दु:खी झालो नव्हतो. मी काय गमावलंय, हे मला समजलं होतं”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

वडील ऋषी कपूर यांच्याशी फार जवळीक नसल्याचं रणबीरने अनेक मुलाखतींमध्ये बोलून दाखवलं होतं. मात्र त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही हा दुरावा मिटवू शकलो नाही, याची खंत त्याने व्यक्त केली. याविषयी तो म्हणाला, “न्यूयॉर्कमध्ये त्यांचे उपचार सुरू असताना मी तिथे 45 दिवस होतो. एकेदिवशी ते अचानक माझ्याजवळ येऊन रडू लागले होते. त्यांनी त्यांची ही हळवी बाजू कधीच माझ्यासमोर दाखवली नव्हती. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना मिठी मारावी की त्यांना सावरावं हे मला कळत नव्हतं. माझ्यात फार संकोचलेपणा होता. त्या क्षणी मला आमच्या दोघांच्या नात्यातील अंतर स्पष्ट दिसत होतं. पण ते अंतर मिटवून त्यांना मिठी मारावी किंवा त्यांना प्रेम करावं याची जाणीव मला त्याक्षणी न झाल्याची खंत आजही आहे. तुम्हाला अशा पद्धतीने लहानाचं मोठं केलं जातं, जिथे तुम्ही अचानक जबाबदार व्यक्ती बनता. तुमच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असतात. माझी आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मी एका मुलीचा पिता आहे आणि माझ्या वडिलांचं निधन होतं… मी माझी हळवी बाजू दाखवू शकतो का? हे काय असतं मला माहित नाही, पण मी ते कधीच माझ्या चेहऱ्यावर दाखवलं नाही.”

Follow Us