पावसाळ्यातील प्रचंड सुंदर गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, 47 वर्षानंतर प्रत्येकजण गुणगुणतो गाणं

पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय गाणं, जे प्रत्येक व्यक्तीच्या प्लेलिस्टमध्ये ऐकायला मिळतं. 47 वर्षानंतर या गाण्याची प्रचंड लोकप्रियता. आजही पहिल्या पावसानंतर हे गाणं गुणगुणतात लोक.

पावसाळ्यातील प्रचंड सुंदर गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही, 47 वर्षानंतर प्रत्येकजण गुणगुणतो गाणं
| Updated on: Jun 27, 2026 | 3:14 PM

Trending Song : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक शान यांनी दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त त्यांना अनोखी संगीतमय आदरांजली वाहिली. पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणात त्यांनी सदाबहार ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणे सादर करत पंचमदांच्या अविस्मरणीय संगीताला सलाम केला. शान यांनी हा खास व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून, चाहत्यांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

व्हिडिओमध्ये शान आपल्या घराच्या अंगणात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करून पावसाळ्याचा आनंद घेताना दिसतात. गाणे सुरू करण्यापूर्वी त्यांनी पंचमदांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले, आजचे वातावरण खूप सुंदर आहे आणि त्यात एक हलकीशी उदासीही आहे. पावसाळ्याचा हा ऋतू आणि पंचमदांच्या जयंतीनिमित्त माझ्याकडून ही छोटीशी संगीतमय आदरांजली. त्यानंतर त्यांनी भावपूर्ण शैलीत ‘रिमझिम गिरे सावन’ हे अजरामर गाणं सादर केले.

आजही हे गाणं प्रचंड लोकप्रिय

हे गाणे 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंजिल’ या चित्रपटातील असून, त्यात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या गाण्याला संगीत आर. डी. बर्मन यांनी दिले होते, तर किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या दोन स्वतंत्र आवृत्त्यांमुळे हे गाणं आजही रसिकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. पावसाळ्यावर आधारित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक म्हणून आजही या गाण्याची ओळख कायम आहे.

राहुल देव बर्मन यांनी भारतीय संगीताला आधुनिक पाश्चात्त्य संगीताची जोड देत हिंदी चित्रपटसंगीतात नवा प्रवाह निर्माण केला. जॅझ, रॉक, लॅटिन आणि भारतीय लोकसंगीताचा सुरेख संगम घडवून त्यांनी हिंदी चित्रपटसंगीताला नवी दिशा दिली. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. ‘चुरा लिया है तुमने’, ‘महबूबा महबूबा’, ‘दम मारो दम’, ‘ये शाम मस्तानी’, ‘मुसाफिर हूं यारों’, ‘तेरे बिना जिंदगी से’ यांसारख्या असंख्य अजरामर गाण्यांनी त्यांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केले.


शान यांनी सादर केलेल्या या खास आदरांजलीमुळे पंचमदांच्या सुवर्णकाळातील संगीताच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या असून, सोशल मीडियावर संगीतप्रेमींकडून या व्हिडिओचे भरभरून कौतुक केले जात आहे.

 

Follow Us