माधुरी दीक्षितने संजय दत्तसोबत का केलं होतं ब्रेकअप? समोर आलं खरं कारण
बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांचं ब्रेकअप का झालं, याविषयीचा खुलासा एका सिनेपत्रकाराने केला आहे. 'खलनायक' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा त्यांना सांगितला आहे.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. सोबत काम करतानाच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नव्वदच्या दशकात माधुरी आणि संजय यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या ब्रेकअपमागील नेमकं कारण काय होतं, याविषयी विविध चर्चा आजवर ऐकायला मिळाल्या. मात्र आता सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ज्योती यांनी संजय आणि माधुरी यांच्या ‘खलनायक’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा किस्सा सांगितला.
पार्टीतून दोघं गायब
ज्योती म्हणाले, “जेव्हा ‘खलनायक’ या चित्रपटाची शूटिंग मैसूर इथं सुरू होती, तेव्हा दिग्दर्शक सुभाष घई यांनी सर्व पत्रकारांना तिथे बोलावलं होतं. मीसुद्धा तिथे गेलो होतो आणि दुपारी संजय-माधुरी दोघांना भेटलो होतो. त्याच दिवशी संध्याकाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्या पार्टीतून माधुरी आणि संजय दोघं गायब झाले होते. पार्टीसाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो असता तिथे मी जॅकी श्रॉफ आणि सुभाष घई यांना पाहिलं होतं. तेव्हा सुभाषजी मला म्हणाले, अरे तुम्ही ड्रिंक्स सुरू करा. त्यावर मी सांगितलं की, संजू बाबा आणि माधुरी यांची प्रतीक्षा करतो. तेव्हा जॅकीने उत्तर दिलं की, संजू आणि माधुरी पार्टीला येणार नाहीत, ते दोघं व्यस्त आहेत.”
याविषयी ज्योती यांनी पुढे सांगितलं, “मी विचारात पडलो होतो की, आऊटडोअर चित्रपटाच्या कव्हरेजसाठी पत्रकारांना बोलावण्यात आलं आहे. परंतु मुख्य कलाकारच पार्टीत नाहीत. ते दोघं पार्टीला आले नव्हते. ते दोघं काय करत होते, हे मला माहीत नाही. इंडस्ट्रीत लोक भेटतात आणि त्यांचे मार्ग वेगळेही होतात. ही त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा संजय आणि माधुरी एकमेकांच्या खूप जवळ होते.”
का झालं ब्रेकअप?
संजय आणि माधुरी यांच्यात इतकी जवळीक होती, तर मग ब्रेकअप का झालं, असा प्रश्न ज्योती यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “कारण संजय दत्त त्याच्या वचनावर ठाम राहिला नाही. माधुरीला अपेक्षा होती की तो तिच्याशी लग्न करेल. परंतु संजयने आधीच वैवाहिक आयुष्यातील समस्यांचा सामना केला होता. त्यामुळे त्याला पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं.” संजय दत्त त्यावेळी विवाहित होता. अभिनेत्री ऋचा शर्माशी त्याने 1987 मध्ये लग्न केलं होतं. 1996 मध्ये ऋचाचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.
ज्योती यांना पुढे असंही विचारण्यात आलं की, त्यावेळी संजय दत्त टाडा (TADA) आणि इतर आरोपांचाही सामना करत होता. याच कारणामुळे माधुरीने स्वत:ला त्याच्यापासून दूर केलं का? यावर ज्योती यांनी उत्तर दिलं, “होय. त्यानंतर माधुरीने त्याच्यापासून दूर राहण्यासाठी चांगलं कारण मिळालं होतं. संजय लग्नासाठी तयार नव्हता आणि त्यातच तो कायदेशीर बाबींमध्येही अडकला होता. यानंतर माधुरीने संजयपासून स्वत:ला दूर करण्यास सुरुवात केली. ”
पहिल्या पत्नीलाही होती कल्पना
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मालाही माधुरी आणि संजय यांच्या नात्याविषयी माहीत होतं. 1993 मध्ये ‘स्टारडस्ट’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला होता की, माधुरीसोबतच्या ब्रेकअपनंतर संजय पूर्णपणे खचून गेला होता. कारण तो भावनिकदृष्ट्या माधुरीवर अवलंबून होता.