
‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशी याने नुकतीच अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयात हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांची पहिली भेट कशी झाली, त्यांची लव्ह-स्टोरी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच अंशुमन आणि अपूर्वाने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. अपूर्वाला अभिनय क्षेत्रातील नवरा नको होता, परंतु अंशुमनला भेटल्यानंतर तिचे विचार बदलले.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने सांगितलं, “मला माझ्या क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे मी तसाच मुलगा शोधत होते. अंशुमन आणि माझी ऑनलाइन ओळख झाली आणि जेव्हा त्याने मला भेटुयात का असं विचारलं, तेव्हा एकाच इंडस्ट्रीतले म्हणून मी भेटायला गेले. अभिनयक्षेत्रातच काम करतो, त्यामुळे कधी ना कधी भेट होईलच, असा विचार करत नाही नको म्हणायला म्हणून मी त्याला भेटले. त्यावेळी माझ्या डोक्यात लग्नाचा काहीच विचार नव्हता. मी सहजच भेटायला गेले. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच भेटीत आम्ही तब्बल सहा तास गप्पा मारल्या होत्या.”
“अंशुमनने मला लग्नाबद्दल माझे विचार काय आहेत, याबद्दल विचारलं. त्यानंतर तो मला घरी सोडायला आला. आम्ही जेव्हा माझ्या घराखाली पोहोचलो, तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, हाच संकेत असेल का? खरंतर आम्हा दोघांनाही चॅटिंगपेक्षा फोनवर थेट बोलायला आवडतं. पण त्या भेटीनंतर आम्ही संपूर्ण रात्र एकमेकांशी चॅट करत होतो. त्यानंतर आठवडाभर आम्ही खूप बोललो. एकाच इंडस्ट्रीत काम करणारे आहोत, ही एक अढी होती. त्याविषयी मी त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की आपलं लग्न होईल किंवा मग चांगली मैत्री होईल. त्यानुसार आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला”, अशा शब्दांत अपूर्वा व्यक्त झाली.
2025 मध्ये अंशुमन आणि अपूर्वाची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीच्या वर्षभरातच त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेतला. कितीही अडचणी आल्या तरी मी अपूर्वासोबतच राहीन, अशी भावना मनात निर्माण झाल्याचं अंशुमनने यावेळी सांगितलं.