Adnan Sami: अदनान सामीने पाकिस्तान का सोडलं? लवकरच करणार मोठा खुलासा
पाकिस्तानबद्दल अदनान सामीची खळबळजनक पोस्ट; म्हणाला 'सत्य सर्वांसमोर आणेन'

मुंबई- प्रसिद्ध गायक अदनान सामी पाकिस्तानी नागरिकत्व सोडत 2016 मध्ये भारताचा नागरिक झाला. नुकतीच त्याने सोशल मीडियावर पाकिस्तानबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. पाकिस्तानने आपल्यासोबत काय केलंय, याचा खुलासा करणार असल्याचं धक्कादायक विधान त्याने पोस्टमध्ये केलं आहे.
अदनान सामीची पोस्ट-
‘अनेकजण मला विचारतात की मला पाकिस्तानबद्दल इतका तिरस्कार का आहे? मात्र कटू सत्य हे आहे की माझ्याशी चांगलं वागणाऱ्या पाकिस्तानच्या लोकांबद्दल माझ्या मनात अजिबात तिरस्कार नाही. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. मात्र मला आस्थापनेशी संबंधित समस्या आहे. जे मला खरोखर ओळखतात, त्यांना हे देखील माहीत असेल की त्या आस्थापनेनं गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत काय केलं? माझं पाकिस्तान सोडण्यामागचं हेच मोठं कारण होतं’, असं त्याने लिहिलं.
‘त्यांनी मला कशी वागणूक दिली याचा खुलासा मी एके दिवशी नक्कीच करेन आणि तो दिवस लवकरच येईल. ते सत्य ऐकून सर्वसामान्यांना मोठा धक्का बसेल. मी गेली अनेक वर्ष याबद्दल मौन बाळगलं होतं. मात्र योग्य वेळ येताच मी त्याचा खुलासा करेन,’ असंही अदनानने स्पष्ट केलं.
अदनानच्या या पोस्टमुळे अनेकांनाच प्रश्न पडला आहे की नेमकं त्याच्यासोबत काय घडलं होतं? अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अदनानला साथ दिली.
अदनान सामी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. अनेकदा त्याच्या पोस्टवरून भारतीय आणि पाकिस्तानी युजर्स यांच्यात खडाजंगी होताना दिसते. नुकत्यात पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या इंग्लंडच्या विजयावर अदनानने पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने इंग्लंडला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ‘चांगली टीम विजयी ठरली’, असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीमच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.