“मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..”; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायकाकडून राग व्यक्त

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. बैसरन खोऱ्यात काही दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

मुस्लीम असल्याची लाज वाटतेय..; पहलगाम हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायकाकडून राग व्यक्त
Salim Merchant on Pahalgam Attack
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2025 | 9:20 AM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत प्रसिद्ध बॉलिवूड गायक सलीम मर्चंटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “मला मुस्लीम असल्याची लाज वाटू लागली आहे”, असं ते या व्हिडीओत म्हणाले. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधून गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.

या व्हिडीओमध्ये सलीम म्हणाला, “पहलाममध्ये जे निर्दोष लोक मारले गेले, ते यासाठी मारले गेले कारण ते हिंदू होते, मुस्लीम नाही. मग अतिरेकी मुस्लीम आहेत का? नाही, ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम ही शिकवण देत नाही. कुराण शरीफच्या सूरह अल-बकराहच्या आयत 256 मध्ये म्हटलं गेलंय की धर्मात कोणतीही बळजबरी नसते. हे कुराण शरीफमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे.”

“एक मुस्लीम असून मला हे सर्व पाहून लाज वाटतेय की निर्दोष हिंदू भावाबहिणींची निर्दयपणे हत्या करण्यात आली, कारण ते हिंदू आहेत. हे सर्व कधी संपणार? काश्मीरमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून लोक खूप चांगल्याप्रकारे राहत होते. आता त्यांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागणार आहे. मी याबद्दलचं दु:ख आणि राग कसा व्यक्त करू हेच समजत नाहीये”, असं तो पुढे म्हणाला.

कॉमेडियन मुनव्वर फारुकीनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सलीम मर्चंट यांचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “मी मान झुकवून त्या निरपराध लोकांसाठी प्रार्थना करतो, ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत. देव त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो.” कलाक्षेत्रातील इतरही अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना पकडून कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी आज गुरूवारी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम हल्ल्यासंदर्भातील सविस्तर माहिती सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांना देतील.