याला म्हणायचं गाणं, जे ऐकताच ओठ आपोआप गुणगुणतात, 103 अंश ताप असूनही श्रीदेवीने केलेलं पूर्ण

103 अंश ताप असून देखील मुसळधार पावसात श्रीदेवी यांनी पूर्ण केलं हे गाणं, 37 वर्षानंतरही ऐकताच चाहत्यांचे ओठ आपोआप गुणगुणतात.

याला म्हणायचं गाणं, जे ऐकताच ओठ आपोआप गुणगुणतात, 103 अंश ताप असूनही श्रीदेवीने केलेलं पूर्ण
| Updated on: Jul 31, 2026 | 7:14 PM

बॉलिवूडच्या पहिल्या ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी या त्यांच्या अप्रतिम अभिनयासोबतच कामाप्रती असलेल्या निष्ठेसाठीही प्रसिद्ध होत्या. कोणतीही भूमिका असो किंवा नृत्यदृश्य, त्या प्रत्येक कामात शंभर टक्के मेहनत घेत असत. याचं उदाहरण म्हणजे 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चालबाज’ चित्रपटातील एक गाणं. तब्बल 103 अंश ताप असतानाही श्रीदेवींनी या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं होतं. विशेष म्हणजे हेच गाणं पुढे जाऊन बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि आयकॉनिक गाण्यांपैकी एक ठरलं.

श्रीदेवींवर चित्रित झालेलं ‘ना जाने कहाँ से आई है, ना जाने कहाँ को जाएगी, दीवाना किसे बनाएगी ये लड़की’ हे गाणं आजही रसिकांच्या आवडीचं आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चालबाज’ चित्रपटातील हे गाणं श्रीदेवींच्या खट्याळ आणि उत्साही व्यक्तिरेखेला अगदी साजेसं ठरलं होतं. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या गाण्याला कविता कृष्णमूर्ती आणि अमित कुमार यांनी आवाज दिला होता. गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते, तर लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांच्या जोडीने संगीत दिलं होतं.

सरोज खान यांनी सांगितला होता शूटिंगमागचा किस्सा

या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शिका दिवंगत सरोज खान यांनी एका मुलाखतीत या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, गाण्याच्या शूटिंगच्या वेळी श्रीदेवींना तब्बल 103 अंश ताप होता. इतक्या प्रकृतीच्या अडचणी असूनही त्यांनी शूटिंग रद्द करण्यास नकार दिला.

उलट पावसात भिजत त्यांनी संपूर्ण गाण्याचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्यांचा कामाप्रती असलेला हा दृष्टिकोन पाहून चित्रपटाच्या सेटवरील सर्वजण थक्क झाले होते. श्रीदेवींच्या व्यावसायिक वृत्तीचं हे उदाहरण आजही चित्रपटसृष्टीत आवर्जून सांगितलं जातं.

‘चालबाज’ ठरला कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा

‘चालबाज’ हा श्रीदेवींच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. चित्रपटात त्यांच्यासोबत सनी देओल आणि रजनीकांत प्रमुख भूमिकेत झळकले होते.

या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी श्रीदेवींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 1989 मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांमध्ये ‘चालबाज’चा समावेश झाला होता. आजही या चित्रपटातील गाणी आणि श्रीदेवींचा अभिनय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us