Suniel Shetty | टोमॅटोच्या वाढत्या किंमतींबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अखेर सुनील शेट्टीने मागितली माफी

'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले होते, "माझी पत्नी फक्त ताज्या आणि दोन दिवस टिकणाऱ्या भाज्या आणते. मात्र अलीकडे टोमॅटोचे दर खूप वाढले आहेत. त्याचा परिणाम आमच्याही स्वयंपाकघरावर झाला आहे. त्यामुळे आजकाल आम्ही टोमॅटो कमी खात आहोत."

Suniel Shetty | टोमॅटोच्या वाढत्या किंमतींबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अखेर सुनील शेट्टीने मागितली माफी
Suniel Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2023 | 10:58 AM

मुंबई | 19 जुलै 2023 : टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किंमतीची चर्चा सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत होत आहे. अभिनेता सुनील शेट्टीनेही टोमॅटोच्या वाढत्या किंमतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. या किंमतीचा परिणाम त्यालाही भोगावा लागत असल्याचं सुनील शेट्टीने म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर यामुळे टोमॅटो कमी खात असल्याचं त्याने सांगितलं होतं. सुनील शेट्टीचं हेच वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांनीही सुनील शेट्टीच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. आता या सर्व वादानंतर सुनील शेट्टीने माफी मागितली आहे.

काय म्हणाले होते सुनील शेट्टी?

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले होते, “माझी पत्नी फक्त ताज्या आणि दोन दिवस टिकणाऱ्या भाज्या आणते. आम्ही ताज्या भाज्या घेणं पसंत करतो. मात्र अलीकडे टोमॅटोचे दर खूप वाढले आहेत. त्याचा परिणाम आमच्याही स्वयंपाकघरावर झाला आहे. त्यामुळे आजकाल आम्ही टोमॅटो कमी खात आहोत. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. त्या ॲपवर भाज्यांच्या किंमती पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल. इतर मार्केट आणि ॲप्सच्या तुलनेत तिथे भाज्या स्वस्त आहेत. पण इथे फक्त पैशांचा प्रश्न नाही, तर भाज्यांच्या ताजेपणाचाही आहे. आम्हाला प्रॉडक्ट, त्याचं मूळ आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या प्रकाराचीही माहिती मिळते. हे सर्व पाहून मी समाधानी आहे. माझ्या या खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेचा फायदा शेतकऱ्यांना होतो. कारण त्यांची उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ”

सुनील शेट्टीने मागितली माफी

सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता सुनील शेट्टीने माफी मागितली आहे. “मी खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचं समर्थन करतो. त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी नेहमीच त्यांच्या पाठिंब्याने काम केलं आहे. मला आपल्या देशी उत्पादनांचा प्रचार करायचा आहे. आपल्या शेतकऱ्यांना त्याचा नेहमीच फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे. शेतकरी हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझे हॉटेल्स असल्याने नेहमीच त्यांच्याशी माझा थेट संबंध राहिलेला आहे. माझ्या कोणत्याही वक्तव्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचा विचार मी माझ्या स्वप्नातही विचार करू शकत नाही. कृपया माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका. या विषयावर मी आता अधिक काही बोलू शकत नाही.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us