थेट श्री श्री रवी शंकर यांना सुनीलने विचारला कपिलसोबतच्या वादाचा प्रश्न; उत्तर ऐकाच..

'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करताना कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात एका विमानप्रवासादरम्यान वाद झाला होता. या वादानंतर सुनीलने कपिलचा शो सोडून दिला होता. तब्बल सात वर्षांनंतर हे दोघं एकत्र आले आहेत.

थेट श्री श्री रवी शंकर यांना सुनीलने विचारला कपिलसोबतच्या वादाचा प्रश्न; उत्तर ऐकाच..
कपिल शर्मा, श्री श्री रवी शंकर, सुनील ग्रोवर
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2024 | 10:47 AM

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नात्यात बरेच चढउतार अनुभवले आहेत. ‘द कपिल शर्मा शो’मधून जेव्हा सुनीलने काढता पाय घेतला, तेव्हा अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. विमानातून प्रवास करताना कपिलसोबत सुनीलचा वाद झाला आणि त्यानंतर त्याने हा शो सोडल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर सात वर्षांपर्यंत या दोघांनी एकत्र काम केलं नाही. अखेर काही महिन्यांपूर्वी दोघांनी आपापसांतील मतभेद दूर केले आणि पुन्हा एकत्र काम केलं. नुकतंच या दोघांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवी शंकर या अध्यात्मिक गुरुंची भेट घेतली. यावेळी सुनीलने त्यांना कपिलसोबतच्या भांडणाबाबतचा प्रश्न अत्यंत गमतीशीरपणे विचारला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुनीलचा प्रश्न-

कपिल आणि सुनील हे दोघं बेंगळुरूमधील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आश्रमात गेले होते. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील त्यांना विचारतो, “गुरुदेव, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा एकमेकांवर भरपूर प्रेम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये भांडण होतं, तेव्हा सहा वर्षांचं अंतर न ठेवता किंवा अशी परिस्थिती टाळून ते पुन्हा कसे एकत्र येऊ शकतात?” हा प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नव्हे तर सुनीलच्या बाजूला बसलेल्या कपिललाही हसू अनावर झालं होतं.

श्री श्री रवी शंकर यांचं उत्तर-

सुनीलच्या प्रश्नाचं उत्तर देताना रवी शंकर म्हणाले, “भांडण किंवा मतभेद हा प्रेमाचाच एक भाग आहे. आपण एखाद्यावर प्रेम आणि दुसऱ्याशी भांडण करू शकत नाही. प्रेम आणि भांडणासाठी तुम्हाला एकत्रच राहावं लागतं. जिथे प्रेम असतं, तिथेच वाद किंवा भांडणं होऊ शकतात.”

वादाच्या जवळपास सात वर्षांनंतर कपिल आणि सुनील एकत्र आले. कपिलच्या नेटफ्लिक्सवरील शोमध्ये सुनीलने काम केलं होतं. शो सुरू होण्यापूर्वीही सुनीलला पत्रकारांनी वादाबद्दलचा प्रश्न विचारला होता. तेव्हा तो गमतीत म्हणाला, “विमानात बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा खूप वाढणार आहे. त्यावेळी नेटफ्लिक्स भारतात नवीनच होतं. आम्हाला वाटलं की टेलिव्हिजनच्या प्रेक्षकाला जोडून ठेवण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागेल. म्हणूनच आम्ही पब्लिसिटी स्टंट म्हणून ते भांडण केलं होतं.” हे बोलताना सुनीलसह इतरांनाही हसू अनावर झालं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us