अशा कलाकारांच्या भरोशावर KBC चालवणार का? सुनील पाल यांचा सवाल, अमिताभ बच्चन यांच्यावरही साधला निशाणा
कॉमेडियन सुनील पाल यांनी 'कौन बनेगा करोडपती' आणि अमिताभ बच्चन यांच्यावर नाराजी व्यक्त केली. शोमध्ये अश्लील भाषा वापरणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन्सना बोलावल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. पाल यांनी विचारले की, फॅमिली शोमध्ये अशा कलाकारांना व्यासपीठ का दिले जाते? लहान मुलेही हा शो पाहतात, त्यामुळे कार्यक्रमातील भाषेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

एकेकाळी आपल्या कॉमेडीमुळे देशभरात सर्वांना खळखळून हसवणारे सुनील पाल (Sunil Pal) सध्या त्यांच्या टॅलेंटमुळे नव्हे तर बेधडक वक्तव्यांमुळेच चर्चेत असतात. आता कॉमेडिअन सुनील पाल पुन्हा चर्चेच आलेत. टीव्हीवारच सर्वात मोठा क्विझ शो असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्यावर सुनील पाल यांनी सवाल उपस्थित केले. खरंतर KBC च्या सेटवरून कॉमेडिअन गौरव कपूर आणि गौरव गुप्ता या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला, ते या शोमध्ये गेस्ट म्हणून सहभागी होणार असल्याचं त्यावरून स्पष्ट झालं. मात्र हा व्हिडीओ पाहताच सुनील पाल भडकले आणि त्यांनी सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारे आपला संताप व्यक्त केला. केबीसी मेकर्स आणि अमिताभ बच्चन यांनाही पाल यांनी सुनावलं.
KBC वाल्यांना विचारले प्रश्न
सुनील पाल यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली. शोमध्ये शिवीगाळ करणाऱ्या लोकांना बोलावू नका, असं मी केबीसीच्या निर्मात्यांना बऱ्याच काळापासून सांगतोय, असं ते म्हणाले. “हे लोक तुमच्या कार्यक्रमात का येतात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुनील पाल यांनी कोणाचंही नाव न घेता काही यूट्यूबर्स आणि कॉमेडियन्सच्या भाषेवर आक्षेप घेतला. अशा कलाकारांना फॅमिली शोमध्ये व्यासपीठ देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असंही त्यांनी म्हटलं.
अमिताभ बच्चन यांना थेट सवाल
सुनील पाल यांनी या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनाही थेट सवाल केला. ते म्हणाले की, KBC हा लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण पाहतात. त्यामुळे कार्यक्रमात कोणत्या प्रकारची भाषा वापरली जाते, याचा विचार करण्याची गरज आहे. KBCमध्ये 14 प्रश्न विचारले जातात; मात्र आता 15 वा प्रश्न संपूर्ण जग तुम्हाला विचारणार आहे—एवढे मोठे कलाकार असून तुम्ही अशा कलाकारांच्या भरोशावर तुमचा शो चालवणार का? असं म्हणत सुनील पाल यांनी अमिताभ बच्चन यांना टोला लगावला.
समय रैनाच्या वेळीही केली होती टीका
केबीसी आणि स्टँडअप कॉमेडिअन्सवर निशाणा साधण्याची सुनील पाल यांची पहिली वेळ नाही. आधी स्टँड-अप कॉमेडियन समय रैना KBCच्या सेटवर आला होता, त्यावेळीही सुनील यांनी शिवीगाळ करणाऱ्या कॉमेडियन्सना कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यावर प्रश्न उपस्थित केला होता.
मात्र, सुनील पाल यांनी आपण कोणत्याही कलाकाराच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केलं. त्यांचा आक्षेप केवळ कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अश्लील आणि अभद्र भाषेला आहे. फॅमिली शो पाहणाऱ्या प्रेक्षकांचा, विशेषतः लहान मुलांचा विचार करून कार्यक्रमातील भाषेची निवड केली जावी, अशी त्यांची भूमिका आहे.