उदय सामंतांनी पत्नीसाठी सरकारी यंत्रणा कामाला..; विजय पाटकरांच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंचा घणाघात

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी अर्ज भरू न दिल्याचा आरोप केल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.

उदय सामंतांनी पत्नीसाठी सरकारी यंत्रणा कामाला..; विजय पाटकरांच्या आरोपानंतर सुषमा अंधारेंचा घणाघात
Uday Samant and Neelam Shirke
Image Credit source: Instagram
| Updated on: May 25, 2026 | 12:05 PM

दहा वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळतोय. नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महामंडळावर राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्यांकडून होत आहे, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला होता. नीलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊ दे, पण माझा उमेदवारी अर्जसुद्धा भरू दिला नाही, अशी तक्रार त्यांनी केली. यात राजकीय हस्तक्षेप आहे पण तो उदय सामंत यांचा आहे का, हे मला माहीत नाही, असं वक्तव्य पाटकर यांनी केलं होतं. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. पत्नीची निवड व्हावी यासाठी उदय सामंत यांची संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांची पोस्ट-

‘मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्यालासुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते, जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे, पण नेते अभिनेत्यांच्या हक्काचे कलाक्षेत्रही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे,’ अशी पोस्ट अंधारे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली आहे.

विजय पाटकर यांचा आरोप काय?

“एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या चार दिवसापासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या वतीने हा व्यक्ती नको तो व्यक्ती नको असं सांगितलं जात आहे. मोठा दबाव आणला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्यांची आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत. मागील 40 वर्षे आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं,” असा संतप्त सवाल पाटकर यांनी केला होता.

या निवडणुकीत मावळत्या संचालिका आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे, तर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी त्यांना आव्हान दिलं आहे.

Follow Us