मंत्र्याकडून दबाव, मला अर्जही.., चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीबद्दल विजय पाटकर यांचा गौप्टस्फोट
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका मंत्र्यांकडून होत आहे, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर मला उमेदवारीचा अर्जही भरू दिला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

सध्या मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असा धक्कादायक आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. इतकंच नाही तर महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले आहेत. “त्यांना लाज वाटायला पाहिजे. मागील दहा वर्षे त्यांनी काय केलं? महामंडळाचं अक्षरश: थडगं करून ठेवलंय. त्यांनी सात महिने कर्मचाऱ्यांना पगारदेखील दिला नाही. उलट मला फोन करून बोलतात की माझ्या पॅनलमधून उभे राहा. यांना लाज कशी वाटत नाही? मी काय माती खाल्ली आहे का, त्यांच्या पॅनलमधून उभा राहायला”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यातून 17 उमेदवार निवडले जाणार आहेत.
मंत्र्यांवर आरोप
विजय पाटकर यांनी मंत्र्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. “एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या चार दिवसापासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या वतीने हा व्यक्ती नको तो व्यक्ती नको असं सांगितलं जात आहे. मोठा दबाव आणला जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्यांची आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत. मागील 40 वर्षे आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं,” असा संतप्त सवाल पाटकर यांनी केला.
राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
या निवडणुकीत मावळत्या संचालिका आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे, तर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. “नीलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होऊ दे. पहिल्यांदा महिला अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनेल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही. माझा उमेदवारी अर्ज हा राजकीय कारणामुळे भरून दिला गेला नाही आणि माझ्यासोबतच क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचा सुद्धा फॉर्म भरून दिला नाही. यात राजकीय हस्तक्षेप आहे पण यात उदय सामंत यांचा राजकीय हस्तक्षेप आहे का? हे मला माहीत नाही. पण एका मंत्र्यांचा ओएसडी हा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे,” असे थेट आरोप त्यांनी राजकारण्यांवर केले आहेत.
