राधा-कृष्णचं सुपरहिट गाणं, जे 25 वर्षांपूर्वी मुस्लिम कलाकारांनी बनवलं, ठरलं प्रचंड सुपरहिट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 25 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे मुस्लिम कलाकारांनी बनवलं अजरामर. आजही हे प्रत्येक ठिकाणी वाजत.

भक्तीसंगीत म्हटले की ते लिहिणारे, संगीतबद्ध करणारे आणि सादर करणारे कलाकारही त्या देवतेचे भक्त असतील अशी अनेकांची धारणा असते. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीने वेळोवेळी सिद्ध केले आहे की कला, संगीत आणि सर्जनशीलतेला धर्माच्या सीमांचे बंधन नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले’ हे अजरामर गाणं.
आजही जन्माष्टमी, लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उत्सवांमध्ये हे गाणे आवर्जून ऐकायला मिळते. राधा-कृष्णांच्या प्रेमाची, भक्तीची आणि राधेच्या विरहभावनेची सुंदर मांडणी करणारे हे गाणं दोन दशकांहून अधिक काळानंतरही तितकेच लोकप्रिय आहे.
राधेच्या भावविश्वाचे सुंदर चित्रण
‘राधा कैसे ना जले’ या गाण्यात भगवान श्रीकृष्ण गोपींसोबत रास खेळताना पाहून राधेला होणारी ईर्ष्या, तिची नाराजी आणि त्यानंतर कृष्णाने आपल्या खट्याळ, प्रेमळ स्वभावाने तिला समजावण्याचा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. गाण्यातील प्रत्येक शब्द राधा-कृष्णांच्या प्रेमाची आणि भक्तीची अनुभूती देतो.
या गाण्याची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे चारही प्रमुख कलाकार मुस्लिम धर्मीय होते. या गाण्याचे अर्थपूर्ण आणि भावपूर्ण शब्द प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले. गाण्याला मधुर आणि अविस्मरणीय संगीत संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी केले. हे गाणं लगान चित्रपटात आमिर खान आणि ग्रेसी सिंह यांच्यावर चित्रित करण्यात आले.
या सर्व कलाकारांनी आपल्या कलेच्या बळावर राधा-कृष्णांच्या भक्तीचा भाव इतक्या प्रभावीपणे मांडला की हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय भक्तिरसप्रधान गाण्यांपैकी एक ठरले.
सुरेल आवाजांनी मिळवून दिली अमरता
या गाण्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले, गायक उदित नारायण आणि गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या सुरेल आवाजाची साथ दिली. त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील भावना अधिक प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचल्या.
गाण्याचे बोल, रहमान यांचे संगीत, आशा भोसले आणि उदित नारायण यांचा आवाज तसेच सरोज खान यांचे अप्रतिम नृत्यदिग्दर्शन यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो.
