TMKOC | ‘बबितानेही अनेकदा मालिका सोडली कारण..’; ‘तारक मेहता’च्या अभिनेत्रीचे निर्मात्यांवर आरोप

| Updated on: May 24, 2023 | 11:58 AM

मोनिकाने या मालिकेत बावरीची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये तिने ही मालिका सोडली. मात्र मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांनीही त्यांनी थकलेलं मानधन दिलं नसल्याचा आरोप तिने केला होता.

TMKOC | बबितानेही अनेकदा मालिका सोडली कारण..; तारक मेहताच्या अभिनेत्रीचे निर्मात्यांवर आरोप
Munmun Dutta
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर अभिनेत्रींनी धक्कादायक आरोप केले आहेत. मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर मालिकेत बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियाने निर्मात्यांकडून सेटवर वाईट वागणूक मिळत असल्याची तक्रार केली. इतकंच नव्हे तर मोनिकाने असाही दावा केला आहे की मालिकेत ‘बबिताजी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तालाही सेटवर चुकीची वागणूक मिळाली. म्हणूनच तिने अनेकदा मालिका सोडली होती. मात्र प्रत्येक वेळी मुनमुनला मालिकेत परत बोलावलं जायचं.

“सेटवर मुनमुन दत्ता आणि असित मोदी यांचं दररोज भांडण व्हायचं. सेटवर तिला खूप त्रास दिला गेला. त्यामुळे ती बऱ्याच काळापासून शूटिंगसाठी गेली नसेल. असित मोदी सेटवर तिला त्रास द्यायचे. त्यांच्यामुळेच कलाकार मालिका सोडत आहेत. मुनमुनसुद्धा अनेकदा सेट सोडून निघून गेली होती. मात्र असित मोदी तिला वारंवार परत बोलावून घ्यायचे”, असं मोनिका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

मोनिकाने या मालिकेत बावरीची भूमिका साकारली होती. 2019 मध्ये तिने ही मालिका सोडली. मात्र मालिका सोडल्यानंतर तीन महिन्यांनीही त्यांनी थकलेलं मानधन दिलं नसल्याचा आरोप तिने केला होता. “मी वर्षभरापेक्षा जास्त काळ माझ्या पैशांसाठी लढले. त्यांनी प्रत्येक कलाकाराचे पैसे रोखले आहेत. मग तो राज अनाडकत असो, गुरुचरण सिंग.. त्यांच्याकडे पैशांची कमी नाही. पण फक्त त्रास देण्यासाठी त्यांनी पैसे दिले नाहीत”, असं ती म्हणाली होती.

आईवर कॅन्सरचे उपचार सुरू असताना निर्मात्यांनी साथ न दिल्याची तक्रारही तिने केली होती. “मी रात्रभर आईसोबत रुग्णालयात असायचे आणि ते पहाटे मला शूटिंगला बोलवायचे. माझी मानसिक स्थिती चांगली नाही असं म्हटल्यावरसुद्धा ते मला बळजबरीने शूटिंगला बोलवायचे. वाईट गोष्ट म्हणजे मी सेटवर फक्त बसून राहायचे, पण मला काहीच काम द्यायचे नाहीत”, असं तिने सांगितलं होतं.

“आईच्या निधनानंतर सात दिवसांतच त्यांनी मला कामावर बोलावलं होतं. मी कामावर रुज होण्याच्या मनस्थितीत नसतानाही ते मला म्हणाले की, “आम्ही तुला पैसे देतोय, आम्ही जेव्हा बोलावू तेव्हा तुला कामावर हजर राहावं लागेल, मग तुझी आई रुग्णालयात असो किंवा नाही.” माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नसल्याने मी रोज सेटवर जायचे आणि दररोज रडायचे. सेटवर असित मोदी स्वत:लाच देव समजतात. सेटवर त्यांचीच गुंडगिरी चालते”, असे गंभीर आरोप तिने निर्मात्यांवर केले आहेत.