नट्टू काकांच्या बायपास सर्जरीमुळे ‘बाघा’ला मिळाली संधी; ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी सांगितला किस्सा
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाची निवड कशा पद्धतीने झाली, याविषयीचा खुलासा निर्माते असित कुमार मोदी यांनी केला आहे. या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 28 जुलै 2026 रोजी ‘तारक मेहता..’ या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त निर्मात्यांनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. गेल्या अठरा वर्षांत या मालिकेतून काही कलाकार बाहेर पडले, तर काही नवीन कलाकार त्याच्याशी जोडले गेले. मात्र लोकप्रियतेवर याचा अजिबात परिणाम झाला आहे. जेठालाल, बापूजी, बबिताजी, अय्यर, सोढी, भिडे मास्तर, माधवी भिडे, बाघा, दयाबेन, नट्टू काका यांसारख्या सर्व भूमिका घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत. मालिकेच्या पार्टीत निर्माते असितकुमार मोदी यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. यावेळी त्यांनी बाघाच्या निवडीचा मजेशीर किस्सा सांगितला.
“या मालिकेच्या यशाचं श्रेय कोणत्याही एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण टीमचं आहे. कधी तुम्ही विचार केला का, की अशा पद्धतीने वाकडं उभं राहून तुम्ही काम करू शकता? तेसुद्धा बारा तासांपर्यंत. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे सर्व कलाकार खूप मेहनत करतात. मी त्यांचं महत्त्व जाणतो. ही लोकं या मालिकेसाठी त्यांचं सर्वस्व झोकून देतात”, अशा शब्दांत त्यांनी टीमचं कौतुक केलं.
पहा व्हिडीओ-
यावेळी बाघाच्या भूमिकेबद्दल ते पुढे म्हणाले, “जेव्हा नट्टू काकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम यांचा बायपास झाला, तेव्हा आम्ही बाघाच्या भूमिकेचा विचार केला होता. कारण नट्टू काकाशिवाय जेठालाल एकटाच दुकानात कसा बसणार? त्याचवेळी आम्ही मालिकेत बाघाची एण्ट्री केली आणि त्याने जेठालालसोबत मिळून जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्याने इतकं दमदार काम केलं की, सर्वत्र बाघाचं कौतुक होऊ लागलं. त्याच्या लोकप्रियतेमुळे नट्टू काकांना चिंता वाटली होती की, त्यांना पुन्हा मालिकेत घेतलं जाणार की नाही? परंतु मी त्यांनाही मालिकेत परत बोलावलं होतं.”
या मालिकेबद्दल सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “दयाबेन कधी परत येणार?” मालिकेत सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानीला याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो हसत म्हणाला, “मलाही माहीत नाही.” दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी ही मालिका सोडली होती. तेव्हापासून ती मालिकेत परतलीच नाही.