‘तारक मेहता..’मधील ‘बाघा’वर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने तन्मय पूर्णपणे खचला आहे.

तारक मेहता..मधील बाघावर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
तन्मय वेकारिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2026 | 3:25 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तन्मयचे वडील अरविंद वेकारिया यांचं निधन झालं आहे. अरविंद वेकारिया हे गुजराती थिएटर आणि चित्रपट अभिनेते होते. त्यांनी ‘तारक मेहता..’ या मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तन्मयसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि दु:खद आहे. आठ महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. आता वडिलांच्या निधनानंतर तो पूर्णपणे खचला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये तन्मयच्या आईने या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता.

कोण होते अरविंद वेकारिया?

अरविंद वेकारिया हे गुजराती रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांनी गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं होतं. ‘योशोदा’ आणि ‘छन्नू चमाकलो’मधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात. ते ‘रुपियो नाच नचावे’ या गुजराती चित्रपटातही झळकले होते. इतकंच नव्हे तर मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तीमान’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. अरविंद यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत एका ज्वेलरची भूमिका साकारली होती. या मालिकेत दाखवण्यात आलं होतं की आत्माराम भिडेला पैशांची गरज असते तेव्हा तो पत्नी माधवीचे दागिने गहाण ठेवतो. ज्या ज्वेलरकडे तो दागिने गहाण ठेवतो, त्याचीच भूमिका तन्मयच्या वडिलांनी साकारली होती.

तन्मयचा सेटवरील व्हिडीओ-

तन्मय वेकारिया त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच तो मालिकेच्या शूटिंगदरम्यान अचानक भावूक झाला होता. आईच्या आठवणीत तो ढसाढसा रडू लागला होता. त्याची ही अवस्था पाहून निर्मात्यांनी मालिकेचं शूटिंग थांबवलं होतं. निर्माते असित कुमार मोदी यांनी तन्मयला सावरण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला होता.

तन्मयला रडताना पाहून सेटवरील इतर कलाकारांच्या आणि क्रू मेंबर्सच्या डोळ्यांतही पाणी आलं होतं. यावेळी तन्मय त्याच्या आईबद्दल म्हणाला की, ‘बाघा’च्या प्रत्येक भागाची त्याचा आई खूप आतुरतेने वाट पाहत असायची. जेव्हा प्रेक्षक त्याच्या अभिनयाचं कौतुक करायचे, तेव्हा त्याची आई खूप आनंदी व्हायची. आईनंतर आता तन्मयच्या डोक्यावरून वडिलांचंही छत्र हरपलं आहे.

Follow Us