Aai Kuthe Kay Karte: स्वार्थी संजनाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; पहिल्यांदाच पटला तिचा स्वभाव

| Updated on: Jun 17, 2022 | 8:10 AM

मालिकेत सध्या ईशाभोवती बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. ईशाला सध्या तिच्या आईची सर्वाधिक गरज असताना संजना कुठेतरी ही कमतरता भरून काढताना दिसून येते. अरुंधती आणि संजना या दोघांची समजावण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी संजनाचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

Aai Kuthe Kay Karte: स्वार्थी संजनाने जिंकली नेटकऱ्यांची मनं; पहिल्यांदाच पटला तिचा स्वभाव
Aai Kuthe Kay Karte
Image Credit source: Instagram
Follow us on

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील अनिरुद्ध (Milind Gawali) आणि संजना (Rupali Bhosle) या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्थात त्यांच्या भूमिकाही नकारात्मक असल्यावर प्रतिक्रियाही तशाच येणार. मात्र अनेकदा मालिकेच्या कथानकात असं काही वळण येतं, की कधीकधी त्यांचे विचारही प्रेक्षकांना पटू लागतात. त्यांच्यातला चांगूलपणा, माणुसकी कुठेतरी दिसून येत असते. असाच एक प्रसंग नुकताच मालिकेत घडणार असून त्याच्या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मालिकेत सध्या ईशाभोवती बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. ईशाला सध्या तिच्या आईची सर्वाधिक गरज असताना संजना कुठेतरी ही कमतरता भरून काढताना दिसून येते. अरुंधती आणि संजना या दोघांची समजावण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी संजनाचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आहे. म्हणूनच या प्रोमोवर कमेंट करताना मालिकेच्या चाहत्यांनी संजनाचं कौतुक केलं आहे.

ईशाचा साहिलसोबत ब्रेकअप झाला आहे आणि त्यामुळेच ती अस्वस्थ झाली आहे. अरुंधतीने तिची समजूत काढलीच आहे, पण आता तिची सावत्र आई म्हणजेच संजनादेखील तिची समजूत काढताना दिसणार आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना ईशा आणि संजना यांच्यातील अत्यंत भावूक सीन पहायला मिळणार आहे. ईशा आणि साहिल एकमेकांशी बोलत असताना अरुंधती तिला बळजबरी घरी घेऊन येते. ती ईशाला ओरडतेसुद्धा आणि तिच्या या ओरडण्यामुळे ईशा चिडते. तेव्हा संजना तिला आपल्या रुममध्ये घेऊन जाऊन तिची समजूत काढते. यावेळी दोघांमध्ये झालेला संवाद आणि संजनाने काढलेली ईशाची समजूत हे मनाला भावणारे आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

‘लग्न अशा माणसाशी करू नये ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे, लग्न अशा माणसाशी करावं ज्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे’, असं संजना ईशाला सांगते. या दोघींचं बोलणं अनिरुद्धही ऐकतो आणि तोसुद्धा भावूक होतो. मालिकेत संजनाला नेहमीच स्वार्थीपणे वागताना प्रेक्षकांनी पाहिलंय. मात्र आता जेव्हा ती ईशाच्या भावनांना समजून तिला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रेक्षकांनाही ती आवडू लागते. आता यामुळे ईशा आणि संजना यांच्यातील जवळीक पुढे वाढणार का, यामुळे अनिरुद्ध घटस्फोटाचा निर्णय मागे घेणार का, हे प्रेक्षकांना पुढे पहायला मिळेल.