आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी

| Updated on: Feb 22, 2022 | 11:22 AM

आगामी एपिसोडचा (Aai Kuthe Kay Karte) नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी
Madhurani Prabhulkar
Follow us on

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने दमदार कथानक आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना स्क्रीनवर खिळवून ठेवलं आहे. ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आगामी एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कांचन देशमुख या भररस्त्यात अरुंधतीला (Arundhati) घरावरील हक्काच्या कागदांवर स्वाक्षरी करायला सांगतात. नकळतपणे संजनाच्या कटात सामील होऊन कांचनसुद्धा अरुंधतीचं मन दुखावतात. बाबांनी अरुंधतीकडे घराचे काही हक्क दिले होते. तेच हक्क परत घेण्यासाठी संजना आणि कांचन तिच्यासमोर आग्रह करतात. अशात अरुंधतीही मागचा पुढचा विचार न करता त्या कागदांवर स्वाक्षरी करते आणि तिचा घरावरचा हक्क सोडून देते. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अनेकांनी यात कांचन देशमुखांवर टीका केली आहे.

नव्या प्रोमोमध्ये काय आहे?
“यात असं लिहिलंय, तू तुझ्या मर्जीने आणि पूर्ण शुद्धीत घराचा तुझ्या नावावर असलेला हिस्सा यांच्या (कांचन देशमुख) नावावर करतेस”, असं म्हणत संजना अरुंधतीला घराची कागदं देते. “जे आमचं आहे, ते आम्हाला परत हवंय”, असं म्हणत कांचनसुद्धा अरुंधतीला टोला लगावतात. कागदांवर सही करून अरुंधती घरावरचा तिचा हक्क सोडून देते. मात्र ते सोडताना ती कांचन देशमुखांना म्हणते, “या घरात माझी काही हक्काची माणसं राहतात. त्यांच्यावरील हक्क तुम्ही कधीच हिरावून घेऊ शकत नाही.”

‘आई कुठे काय करते’चा हा नवा प्रोमो पाहून चाहत्यांनी कांचन देशमुखांवर चांगलीच नाराज व्यक्त केली आहे. ‘सासू ही शेवटी सासूच असते’, असं एकाने कमेंट्समध्ये लिहिलंय. तर ‘अरुंधतीने असं करायला नको होतं. तिने बाबांच्या नावावर तिचे हक्क करायला पाहिजे होते. अरुंधती चुकली,’ असं मत दुसऱ्याने मांडलं. आता अरुंधतीने घरावरील हक्क सोडल्यानंतर संजना पुढे काय करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे अरुंधती पुन्हा एकदा कांचन देशमुख यांचा विश्वास जिंकू शकेल का, हेसुद्धा प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल.