
मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 3) तिसऱ्या पर्वाची सध्या सगळीकडेच खूप चर्चा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व गाजवणारा अभिनेता माधव देवचके (Madhav Deochake) याने पहिल्यांदाच स्पर्धकांविषयी व बिग बॉसच्या घराविषयी आपले मत मांडले आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून माधव देवचके लवकरच रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधवचे फॅन्स जगभर पसरलेले आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखिल ॲक्टीव्ह असतो.
माधव बिग बॉसच्या घराविषयी बोलताना म्हणाला, ‘मी 63 दिवस बीबी हाऊसमध्ये होतो. जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला… परंतु, मी बिग बॉसच्या घराला खूप मिस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. मी देखील स्वतःला नव्याने भेटलो. बिग बॉस हाऊसचं लोकेशन फिल्म सिटीला होतं. त्यामुळे त्या फिल्म सिटीतील सेटवरच्या खूप आठवणी आहेत. माझ्या अनेक मालिकांचे सेट्स देखील तिथेच होते. त्यामुळे ती जागा माझ्यासाठी खूप लकी आहे.’
पुढे त्याने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धकांविषयी देखील भाष्य केले. तो म्हणाला, ‘आता जे 8 स्पर्धक राहिलेत ते सगळेच स्ट्राँग स्पर्धक आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमचं सांगायचं झालं तर, तो समोरच्या टीमशी न भांडता स्वत:च्याच टीमशी जास्त भांडतो. आणि त्यामुळेच तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटिल हा मास्टर माईंड वाटतो. आणि तो माझ्यामते टॉप 3मध्ये असेल. मीनल शहा मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटील म्हणजे कोल्हापुरी ठसका. तिला जर तिची मत योग्यरीत्या मांडता आली, तर तिचा पुढील प्रवास सोप्पा होईल.’
पुढे तो म्हणाला की, ‘मीरा पहिल्या दिवसापासून मनोरंजन करतेय, पण असं वाटतं ती टॉप 5 पर्यंत जाईल. जय दुधाणेबद्दल सांगायचं, तर तो रिॲलीटी शो करून आलाय त्यामुळे त्याला माहिती आहे टास्क कसं खेळतात. परंतु, लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केलं, तर तो पुढे जाईल. उत्कर्ष शिंदे मला टॉप 5मध्ये असेल अस वाटतं. गायत्रीला या आठवड्यात हाताला लागलं असल्यामुळे तिला फिजीकली खेळता येत नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात काय नवीन खेळ होत आहेत हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.’