या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभु दे अशी प्रार्थना करतो.
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे – वटपौर्णिमा (Vat Purnima). विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे ‘सत्यवान आणि सावित्री’ यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळेल. तसंच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांमध्ये वटपौर्णिमा या सणाचा विशेष भाग देखील पाहायला मिळेल. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकतंच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला.
नेहा आणि यशचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजामस्ती हे सर्व तर प्रेक्षकांनी पाहिलंच, पण सोबत यश आणि नेहाचा लग्नसोहळादेखील डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने संपन्न झाला. या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात नेहा आणि यश आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. या पूजेत यश जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभु दे अशी प्रार्थना करतो. हा विशेष भाग रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहा व्हिडीओ-
या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहाची तर अभिनेता श्रेयस तळपदे हा यशची भूमिका साकारतोय. तर चिमुकल्या परीची भूमिका बालकलाकार मायरा वायकुळ साकारतेय. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना नेहा-यशच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता होती. रविवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये लग्नसोहळा दाखवण्यात आला. मात्र यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. अखेर झी मराठी वाहिनीने माफी मागत पुन्हा सोमवारी तो एपिसोड प्रसारित केला.