ओबीसी देणार दिल्लीला धडक, डिसेंबरमध्ये रामलीला मैदानात मोठं आंदोलन; तायवाडेंची घोषणा
जातीय जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजात प्रचंड नाराजी आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबरमध्ये दिल्लीच्या रामलीला मैदानावर भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. जनगणना फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावा, ही प्रमुख मागणी असून, त्यासाठी राज्यभरातील ओबीसी कार्यकर्ते एकत्र येतील.

जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा लवकरच स्फोट होणार आहे. जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा या मागणीसाठी येत्या डिसेंबरमध्ये ओबीसी समाज दिल्लीत धडक देणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी तशी घोषणाच केली आहे. आम्ही डिसेंबरमध्ये दिल्लीत धडक देणार आहोत. दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठं आंदोलन करणार आहोत, अशी माहिती तायवाडे यांनी दिली आहे. तायवाडे हे मीडियाशी संवाद साधत होते.
2016 पासून आम्ही केंद्र सरकारकडे ओबीसींची जातीयनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. एक वर्षापूर्वी केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. आता जनगणना सुरू झाली आहे. पण त्यात फक्त जातीचा कॉलम टाकला आहे. ओबीसींचा टाकला नाही. त्यामुळे आमची अर्धी मागणी पूर्ण झाली आहे. ओबीसींचा कॉलम गणनेत असावा. त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत, असं बबनराव तायवाडे म्हणाले.
कॉलममध्ये ओबीसींचा समावेश करा
आम्ही डिसेंबर मध्ये रामलीला मैदानावर ओबीसीच्या कॉलमसाठी आंदोलन करणार आहोत. आपली मागणी लावून धरणार आहोत. ओबीसींचा रकाना जनगणनेमध्ये अॅड करावा ही मागणी आमची आहे आणि त्यासाठी आम्ही रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील ओबीसी एकवटणार
दिल्लीतील आंदोलनात राज्यभरातील ओबीसी एकवटणार आहेत. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमतील. संवैधानिक मार्गाने आणि शांततेत आमचं आंदोलन होणार आहे. केवळ जणगननेत ओबीसींचा रकाना असावा हीच आमची मुख्य मागणी असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ते जरांगे यांच्या आंदोलनाचं यश
दरम्यान, यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या 58 लाख दाव्याच्या नोंदी सापडल्याच्या दाव्याची पोलखोल केली. मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी सापडल्या हे मला मान्य नाही. फार फार तर मराठा समाजाच्या 59 हजार नोंदी सापडल्या आहेत. एवढ्या मोठ्या नोंदी सापडणं हे सुद्धा जरांगे यांच्या आंदोलनाचं यश आहे, असा दावा तायवाडे यांनी केला.
