The Kerala Story Review | केरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी कहाणी; वाचा रिव्ह्यू..

| Updated on: May 05, 2023 | 8:47 AM

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत, जे पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकीत व्हाल. चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे.

The Kerala Story Review | केरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी कहाणी; वाचा रिव्ह्यू..
The Kerala Story
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आज (5 मे) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे, जी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

या चित्रपटाची कथा शालिनी उन्नीकृष्णन हिच्यापासून सुरू होते. अफगाणी सुरक्षा दल तिला दहशतवादी म्हणत आपल्या ताब्यात घेतात. शालिनी त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती स्वत: दहशतवादी नाही तर पीडित आहे. मात्र तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. यानंतर फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते शालिनीची कहाणी. मूळची कोची इथली शालिनी ही कासरगोडच्या नर्सिंग स्कूलमध्ये शिकवायला जाते. तिथे तिची भेट नीमा, गीतांजली आणि आसिफा यांच्याशी होते.

आसिफाला एका विशेष प्रोफेशनल ट्रेनिंगच्या आधारे तिच्या तीन खास मैत्रिणींचं कशाप्रकारे ब्रेन वॉश करते आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला सांगते हे चित्रपटाच्या सुरुवातीच्या कथेत पहायला मिळतं. केरळमधल्या या मुली आसिफाच्या जाळ्यात अडकतात आणि त्या गरोदर झाल्यानंतर त्यांना देशाबाहेर पाठवलं जातं. या मुलींसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एका हिंदू कुटुंबातील शालिनी उन्नीकृष्णन ही धर्मपरिवर्तनच्या जाळ्यात अडकून कशा पद्धतीने ISIS ची दहशतवादी बनते, हे पुढे कथेत पहायला मिळतं.

हे सुद्धा वाचा

कसा आहे चित्रपट?

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत.

पहा ट्रेलर

अभिनेत्री अदा शर्माने नेहमीच निवडक चित्रपट स्वीकारल्या आहेत. मात्र ‘द केरळ स्टोरी’मध्ये तिने दमदार अभिनय केलं आहे. चित्रपटात तिने दाक्षिणात्य भाषेचा लहेजासुद्धा योग्य पद्धतीने वापरला आहे. अदासोबतच योगिता आणि सोनिया यांच्याही भूमिका ठळक लक्षात राहतात.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत, जे पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकीत व्हाल. चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटात सांगण्यात आलेल्या आकड्यावरून बराच वाद सुरू आहे. केरळमधून 30 हजारहून अधिक महिला गायब झाल्या आहेत, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यावर ते कायम आहेत.