हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड क्रेझ, 3300 रुपयांचे तिकीट असून देखील ॲडव्हान्स बुकिंग शो हाऊसफुल
'द ओडिसी'ची भारतात जबरदस्त क्रेझ! 3,300 रुपयांचे तिकीट असून देखील सर्व शो हाऊसफुल; ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटासाठी चाहत्यांची झुंबड.

हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या बहुप्रतीक्षित ‘The Odyssey’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ असतानाच भारतात IMAX शोसाठी सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगने नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे, तिकिटांचे दर तब्बल 3,000 ते 3,300 रुपयांपर्यंत पोहोचूनही चाहत्यांचा उत्साह कमी झालेला नाही.
8 जून रोजी देशभरातील IMAX थिएटर्समध्ये ‘The Odyssey’ च्या शोसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील प्रीमियम सीट्सची किंमत सुमारे 3,000 रुपये ठेवण्यात आली होती. तर मुंबईतील काही उशिराच्या रात्रीच्या शोसाठी तिकीटदर तब्बल 3,300 रुपयांपर्यंत पोहोचले. हे दर सध्या भारतातील सर्वाधिक महागड्या चित्रपट तिकिटांपैकी मानले जात आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या किंमती असूनही अनेक शो काही मिनिटांतच हाऊसफुल झाले. त्यामुळे नोलन यांच्या लोकप्रियतेचा आणि चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेचा अंदाज येतो.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “The Odyssey साठी भारतात आतापर्यंतची सर्वाधिक तिकीट किंमत पाहायला मिळत आहे. पुण्यातील IMAX थिएटरमध्ये तिकीट 3,000 रुपयांना विकले जात आहे. ख्रिस्तोफर नोलन भारतात एक मोठा ब्रँड बनले आहेत.
दुसऱ्या एका युजरने म्हटले, ‘भारतामध्ये The Odyssey ची क्रेझ अविश्वसनीय आहे. कोणतेही कलाकार किंवा दिग्दर्शक प्रमोशनसाठी भारतात न येताही तिकिटे काही मिनिटांत विकली जात आहेत. ही ख्रिस्तोफर नोलन यांच्या नावाची ताकद आहे.’ तर आणखी एका चाहत्याने लिहिले, 3,200 रुपयांच्या तिकिटांनाही लोकांनी काही मिनिटांत हाऊसफुल केले. नोलन यांच्यासाठी भारतातील चाहत्यांचे प्रेम किती मोठे आहे, हे यातून दिसून येते.
होमरच्या महाकाव्यावर आधारित कथा
‘The Odyssey’ हा चित्रपट प्राचीन ग्रीक कवी Homer यांच्या प्रसिद्ध महाकाव्यावर आधारित आहे. कथा इथाका राज्याचा राजा Odysseus याच्या जीवनाभोवती फिरते.
ट्रॉयच्या युद्धानंतर आपल्या घरी परतण्याचा त्याचा धोकादायक आणि साहसी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. साहस, संघर्ष, नातेसंबंध आणि मानवी जिद्दीची कहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.