‘तू ही रे माझा मितवा’ फेम शर्वरीने अनुभवला वारीचा अद्भुत सोहळा; वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या

'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत ईश्वरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वरी जोग वारीत सहभागी झाली आहे. दिवेघाट ते सासवड पायवारी करुन तिने वारकऱ्यांसाठी भाकऱ्यादेखील बनवल्या आहेत.

तू ही रे माझा मितवा फेम शर्वरीने अनुभवला वारीचा अद्भुत सोहळा; वारकऱ्यांसाठी बनवल्या भाकऱ्या
Sharvari Jog
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 25, 2025 | 11:25 AM

महाराष्ट्रातील सर्वांत मोठं भक्तिपर्व म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. ही केवळ यात्रा नसून ती एक अध्यात्मिक साधना आहे. पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. काहीजण संसाराच्या व्यापातून वेळ काढत ते जमवून आणतात. काहींना मात्र ते शक्य होत नाही. ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर वारी विशेष कार्यक्रम ‘माऊली महाराष्ट्राची’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकरांसोबत ही पंढरीची वारी प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवण्याची संधी मिळत आहे.

आदेश बांदेकरांसोबत स्टार प्रवाहचे अनेक कलाकार देखिल या वारीत सहभागी होऊन हा अद्भूत सोहळा अनुभवत आहेत. ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील ईश्वरी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग नुकतीच या वारीत सहभागी झाली. ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवेघाट ते सासवड असा कठीण टप्पा पायवारी करुन तिने वारकऱ्यांसाठी भाकऱ्या बनवल्या.

या अनुभवाविषयी सांगताना शर्वरी म्हणाली, “मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली. अत्यंत भारावून टाकणारा अनुभव होता. सासवड ते दिवेघाट हा अत्यंत कठीण टप्पा आम्ही पायी सर केला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येत जण भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. आजूबाजूचा हा उत्साह पाहून माझ्यातही नवी उर्जा संचारत होती. या टप्पात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.”

“वारकरी विसाव्यासाठी जिथे थांबतात तिथे मला जाता आलं. हरीपाठ कानावर पडत होता आणि या विलक्षण सुखावणाऱ्या वातावरणात मी भाकऱ्या बनवल्या. हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण एक नवी अनुभूती मिळालीय मला हेच सांगू शकेन,” अशा शब्दात शर्वरीने आपली भावना व्यक्त केली. ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील महान धार्मिक संस्कृतीचा, संतपरंपरेचा, विशेषतः पंढरपूर वारीचा, भावनिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत जात आहे. कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात वारीचा एक एक पैलू समोर येत आहे. वारकऱ्यांच्या दिंड्या, पायी चालण्यामागचं भक्तीचं तत्त्वज्ञान, महिला वारकरींची भूमिका, विध्यार्थी आणि तरुणांचा सहभाग, पालखीचा बैलरथ, भक्तीचं रिंगण, माऊलीचा अश्व, पर्यावरणपूरक वारी, सुश्रुषावारी, अन्नपूर्णा वारी, कर्तव्यवारी, सेवावारी, वारीतले पुंडलिक, वारीतले लक्ष्मी-नारायण, बंधूभेट हा संपूर्ण अनुभव ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us