
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या नूतन यांनी 1950 ते 1960 च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या साध्या, नैसर्गिक आणि प्रभावी अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. त्या काळातील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केले होते. देव आनंद यांच्यासोबतच्या त्यांच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली.
नूतन या फिल्मी कुटुंबातून आल्या असल्या तरी अभिनयाच्या बाबतीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांच्या चित्रपटातील यशाच्या मागे वैयक्तिक आयुष्यातील काही कटू अनुभवही दडलेले होते. ज्यामध्ये त्यांच्या आईसोबतचे संबंध खूप ताणले गेले होते आणि हा वाद त्या काळात खूप चर्चेतही राहिला.
आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात
नूतन यांचा जन्म 4 जून 1936 रोजी एका सांस्कृतिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील कुमारसेन समर्थ हे दिग्दर्शक आणि कवी होते तर आई शोभना समर्थ या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच नूतन यांना चित्रपटसृष्टीचे वातावरण मिळाले.
आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. 1950 मध्ये त्यांनी नल दमयंती आणि हमारी बेटी या चित्रपटांमधून काम केले. विशेष म्हणजे ‘हमारी बेटी’ हा चित्रपट त्यांच्या आईनेच तयार केला होता आणि त्याच बॅनरखाली नूतन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
आईसोबतचा वाद कसा सुरू झाला?
‘शोभना पिक्चर्स’ या प्रोडक्शन बॅनरखाली नूतन यांच्या चित्रपटांचे आर्थिक व्यवहार त्यांच्या आईकडेच होते. नूतन स्वतः या आर्थिक बाबींमध्ये फारसा हस्तक्षेप करत नव्हत्या. मात्र काही काळानंतर या व्यवस्थेमुळेच आई-मुलीच्या नात्यात तणाव निर्माण झाला.
एकदा नूतन यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाकडून थकित कराबाबत पत्र आले. त्यानंतर शोभना समर्थ यांनी तो कर नूतन यांनी भरावा अशी मागणी केली. मात्र नूतन यांनी याला विरोध केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, चित्रपटांतून होणारी सर्व कमाई कंपनीकडे जाते. त्यामुळे त्या फक्त आपल्या वाट्याचा करच भरू शकतात.
कोर्टापर्यंत पोहोचले प्रकरण
या वादामुळे आई-मुलीच्या नात्यातील दरी आणखी वाढली. नूतन यांनी या प्रकरणात आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. या प्रकरणानंतर त्यांच्या नात्यातील कटुता इतकी वाढली की त्यांनी आईपासून पूर्णपणे अंतर ठेवले.
असे म्हटले जाते की या घटनेनंतर नूतन यांनी आपल्या आईशी फारसे संबंध ठेवले नाहीत. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या मागे हा वैयक्तिक संघर्षही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला.