महाराष्ट्रात 50 हून अधिक वर्षे राहूनही अद्याप मराठी का शिकता आलं नाही? बिग बींनी सांगितलं कारण

| Updated on: Apr 25, 2024 | 10:45 AM

अमिताभ बच्चन यांना 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना बिग बी मराठी भाषा शिकण्याविषयी व्यक्त झाले. आतापर्यंत मराठी भाषा शिकणं का शक्य झालं नाही, यामागचं कारण त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 50 हून अधिक वर्षे राहूनही अद्याप मराठी का शिकता आलं नाही? बिग बींनी सांगितलं कारण
Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: रचलेली मराठी कविता सादर करून त्यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. मित्राच्या मदतीने त्यांनी ही मराठी कविता रचली होती. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांची आठवण सांगतानाच मराठी भाषा शिकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बिग बी म्हणाले. “तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असं त्यांनी सांगितलं.

मराठी भाषा शिकण्याविषयी काय म्हणाले बिग बी?

“एका पुरस्कार सोहळ्यात मी मनोगत व्यक्त करायला सुरुवात केल्यानंतर मला प्रेक्षकांनी मराठीत बोला अशी मागणी केली. त्यावर मी त्यांना मी शिकतोय असं सांगितलं आणि मी वाचलो. हा दहा वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. मात्र अजूनही मला मराठी शिकता आलं नाही. तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ नाही मिळाला. पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे,” असं अमिताभ बच्चन म्हणाले.

लतादीदींची आठवण

यावेळी लतादीदींची आठवण सांगताना बिग बी पुढे म्हणाले, “हल्लीच्या काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांतून गीत, नृत्य, अभिनय सादर केले जातात. असे कार्यक्रम मीही करतो. त्यासाठी लतादीदी कारणीभूत ठरल्या. मी न्यूयॉर्कमध्ये असताना 1981 मध्ये लतादीदींनी मला बोलावून घेतलं. त्यांचादेखील न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम होणार होता. तेव्हा त्यांनी त्या कार्यक्रमात मी ‘लावारिस’ चित्रपटातील ‘मेरे अंगने में’ हे गाणं सादर करावं, अशी त्यांची इछ्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार मी या कार्यक्रमात गाणं सादर केलं. दीदींमुळे मी चित्रपटांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमही करू लागलो.”

हे सुद्धा वाचा

दिग्गजांना पुरस्कार

या सोहळ्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांना संगीत क्षेत्रातील सेवेसाठी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नाट्य-चित्रपट-मालिका क्षेत्रातील योगदानासाठी, अभिनेते अतुल परचुरे यांना नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी तर गायक रुपकुमार राठोड यांना हिंदुस्थानी संगीतातील योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीसाठी विशेष वैयक्तिक पुरस्कार अभिनेता रणदीप हुडाला प्रदान करण्यात आला.