संगीतकार पाठक म्हणाले, कसले कवी?, चार ओळी लिहिता येत नाही? आणि ‘हे’ लोकप्रिय गाणं जन्माला आलं

| Updated on: Apr 17, 2021 | 7:44 PM

लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी हजारो गीते लिहिली. त्यांची अनेक गाणी गाजली. (why madhukar pathak shouted on kundan kamble?)

संगीतकार पाठक म्हणाले, कसले कवी?, चार ओळी लिहिता येत नाही? आणि हे लोकप्रिय गाणं जन्माला आलं
kundan kamble
Follow us on

मुंबई: लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी हजारो गीते लिहिली. त्यांची अनेक गाणी गाजली. अनेक गायकांनी ती गाणी जशीच्या तशी म्हटली. गाण्यात काहीच बदल केला नाही. गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही काही त्रास झाला नाही. मात्र, एका गाण्यामुळे त्यांना रेकॉर्डिंग थांबावावं लागलं होतं. काय होता हा किस्सा? कोणतं होतं हे गाणं?, एकदा वाचाच. (why madhukar pathak shouted on kundan kamble?)

कोणतं होतं गाणं?, काय होता किस्सा?

अहो जावईबापू, लय नका तापू,
आजच्या दिसाला राहून जा,
उद्या पोरीला घेऊन जा…

लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी लिहिलेल्या या गाण्याने एकेकाळी धुमाकूळ घातला होता. त्याकाळात लग्नामध्ये हे गाणं हमखास वाजायचंच. या गाण्याचा किस्सा मोठा रंजक आहे. हे गाणं लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी गायलं होतं. मधुकर पाठक यांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचाहा किस्सा आहे. हे गाणं रेकॉर्डिंगला गेलं असताना पाठकांनी गाण्याचं दुसरं चरण बदलायला सांगितलं. गाण्याचं दुसरं चरण बदलता येत नसेल तर गाणं रद्द करण्यात येईल, असं पाठक म्हणाले. त्यामुळे कुंदनदादांना टेन्शन आलं. कुंदनदादा गोंधळून जाऊ नये म्हणून विठ्ठल उमप धावून आले. विठ्ठलदादांनी गाण्याची चार चरणं लिहिली. पण ही कडवी काही पाठकांना आवडली नाही. त्यानंतर कुंदनदादा थिएटर बाहेर आले आणि बाहेर बाकावर बसून चार ओळी खरडल्या. तेवढ्यात पाठक विडी ओढायच्या निमित्ताने बाहेर आले आणि त्यांनी कुंदनदादांना पाहून त्यांची हजेरीच घेतली. ‘अरे तुम्ही कसले कवी? तुम्हाला चार ओळीही लिहिता येत नाहीत?’, असं पाठक म्हणाले. त्यानंतर कुंदनदादांनी घाबरतच पाठकांना कागदावर लिहिलेल्या चार ओळी दाखवल्या. तो कागद डोळ्यासमोर धरत, ‘अरे मला हेच हवं होतं’, असं म्हणत लगेच ते आत गेले आणि गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं. पाठकांना आवडलेल्या त्या ओळी होत्या…

दुधात साखर बघा पडते जशी,
तुमची आम्हाला वाटे गोडी तशी,
काल सकाळी, कपिला व्याली,
खरवस गायीचा खाऊन जा…

विठ्ठल उमप यांनी हे गाणं अत्यंत तन्मयतेने गायलं होतं. त्यांच्या आवाजातील या गाण्याचा गोडवा काही औरच होता. आजही हे गाणं तितकंच श्रवणीय वाटतं.

शाहिरीकडे कसे वळले?

कुंदनदादा जुनी अकरावी पास होते. त्यांचा शाहिरीकडे वळण्याचा प्रवास रंजक आहे. सुरुवातीला ते शाहीर साबळेंची गाणी गायचे. नंतर शाहीर विठ्ठल उमप यांच्या सानिध्यात आले. यावेळी त्यांना आपणही गाणी लिहू शकतो, याची जाणीव झाली आणि दादा लिहिते झाले. त्यांनी हजारो गीते लिहिली. काही त्यांनी गायली तर काही इतर कवींनी गायली. त्यांना सिनेमाच्याही ऑफर आल्या. पण गाणी द्या, पैसे घ्या, पण नाव मिळणार नाही, असं सांगण्यात आलं. त्यामुळे त्यांनी चारपाच गाणी देतो पण एका गाण्याला तरी नाव द्या असं सांगितलं. व्यवहार काही जमला नाही. त्यामुळे त्यानंतर ते त्या वाटेलाही गेले नाहीत.

गाणं लिहून काय पोट भरतं का?

गावाकडे शिमग्याच्या सोंगाला भाऊ जनार्दन कांबळेंच्या ढोलकीच्या तालावर गावात गाणी गात फिरणाऱ्या या शाहीराला गाण्यानं भरपूर मान सन्मान दिला. त्यांची आई सखूबाई त्यांना गाणं लिहून काय पोट भरतं का? शाळेत जा आणि अभ्यास कर असं सांगायची. पण कालांतराने ‘फाटकी नोट…’, ‘जावईबापू लई नका तापू…’ आणि ‘तुझा खर्च लागला वाढू’ ही त्यांची गाणी ऐकून आईची कळी फुलायची. आपल्या लेकाचं गाणं रेडिओवर वाजतंय, कॅसेटमध्ये आलंय, वस्त्यांमध्ये गाजतंय हे पाहून त्यांचं मन भरून जायचं आणि आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कुंदनदादा सुखावून जायचे… (साभार, आंबेडकरी कलावंत) (why madhukar pathak shouted on kundan kamble?)

संबंधित बातम्या:

‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय…’ हे गाणं कुणी लिहिलं? कुठे सूचलं माहीत आहे का?

गाणं गायल्यावरच भीक मिळायची, नंतर अख्ख्या देशाला आपल्या गाण्याने वेड लावलं; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

(why madhukar pathak shouted on kundan kamble?)