
‘हेरा फेरी’ या गाजलेल्या कॉमेडी चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी साइनिंग अमाऊंट घेतल्यानंतर आणि टीझरसाठी शूटिंग केल्यानंतर अभिनेते परेश रावल यांनी अचानक माघार घेतली. त्यानंतर चित्रपटाचा सहनिर्माता असलेल्या अक्षय कुमारने त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर परेश यांनी स्वीकारलेले 11 लाख रुपये व्याजासह परत केले. त्याचसोबत चित्रपट का सोडला, याचंही कारण त्यांनी सांगितलं आहे.
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ आणि 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांच्या बौद्धिक संपत्तीचे अधिकार हे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्याकडे आहेत. त्यांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. ‘हेरा फेरी’ फ्रँचाइजीशी संबंधित कोणत्याही जाहिराती, प्रोमो किंवा इतर कुठलंही शूट करू नका, असं त्यांना सांगण्यात आलंय. असं केल्यास ते जाणूनबुजून कराराचं उल्लंघन मानलं जाईल, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. या सगळ्या गोंधळामुळेच परेश रावल यांनी कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे माघार घेतल्याचं कळतंय.
‘हेरा फेरी 3’ची कोणतीच ठोस स्क्रीप्ट अद्याप तयार नाही. त्यासाठी कलाकारांना किती वेळ द्यावा लागणार होता हे सुद्ध अस्पष्ट होतं. त्यामुळे परेश रावल यांनी त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने परेश रावल यांना ‘हेरा फेरी 3’बद्दल सांगितलं होतं.